Monday 31 December 2018

मिचएल काकोयान्नीस यांच्या 'झोर्बा द ग्रीक' ( १९६४) चित्रपटाचे पोस्टर!

'झोर्बा द ग्रीक' आणि तेंडुलकरांचे रसग्रहण!



काही समकालिन संदर्भांमुळे व प्रसंग औचित्यामुळे..
'झोर्बा द ग्रीक' या अभिजात चित्रपटाची आठवण झाली! त्याचबरोबर आठवले..प्रख्यात लेखक विजय तेंडुलकर यांनी या चित्रपटाचे केलेले रसग्रहण!

१९४६ साली प्रसिद्ध झालेल्या विख्यात ग्रीक लेखक निकोस कझान्टझाकीस यांच्या 'झोर्बा द ग्रीक' या अभिजात कादंबरीस ७० वर्षे पूर्ण होऊन गेली! याच कादंबरीवरून त्याच नावाचा चित्रपट ग्रीक दिग्दर्शक मिचएल काकोयान्नीस यांनी तयार केला..जो डिसेम्बर, १९६४ मध्ये प्रदर्शित झाला होता! 

या चित्रपटात शीर्षक भूमिका केली होती ख्यातनाम मेक्सिकन-अमेरिकन अभिनेते अँथोनी क़ुइन यांनी.. त्यांची जन्मशताब्दी तीन वर्षांपूर्वी होऊन गेली!..या चित्रपटातील मॅडम हॉर्टेन्स ह्या भूमिकेसाठी 'सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री' चा 'ऑस्कर' पुरस्कार लिला केदरोवा ह्या रशियन- फ्रेंच अभिनेत्रीने जिंकला होता!
'झोर्बा द ग्रीक' ( १९६४) चित्रपटात अँथोनी क़ुइन व अॅलन बेट्स!

आपल्या पुस्तकी विश्वातून बाहेर येऊन..
झोर्बा नामक अवलिया बरोबर जीवनाची 
खरी अनुभूती घेणाऱ्या बॅसिल या बुद्धिजीवी लेखकाची ही सफर!..यात अॅलन बेट्स या इंग्लिश अभिनेत्याने ही बॅसिलची भूमिका 'झोर्बा' अप्रतिम रंगवलेल्या अँथोनी क़ुइन बरोबर केली आहे..तर यात विधवेची लक्षवेधी व्यक्तिरेखा साकारणाऱ्या इरेन पापास ह्या ग्रीक अभिनेत्री आता ९२ वर्षांच्या आहेत!
   लेखक विजय तेंडुलकर!

आपल्या धारदार लेखणीने वास्तवदर्शी लेखन करणारे विजय तेंडुलकर हे प्रतिभाशाली नाटककार व पटकथा लेखक होते हे सर्वज्ञात आहे; पण ते जागतिक चित्रपटाचे (विशेषतः अभिनेत्री इन्ग्रिड बर्गमनचे) चाहते आणि उत्तम चित्रपट रसग्रहण करणारे होते हे फार कमी लोकांना माहीत असेल! त्यांचे हे वैशिठ्य मी चित्रपट महोत्सवांतून आणि संबंधित चर्चासत्रातून जवळून अनुभवले आहे..ज्यात त्यांनी एकदा 'झोर्बा द ग्रीक' चित्रपटाचे (पटकथा, तंत्र व अभिनय अशा) बारकाव्यांनिशी रसभरीत विश्लेषण केले होते!..आणि ऐकणारे तो विलक्षण दृश्यानुभव घेत होते!!

- मनोज कुलकर्णी

Sunday 30 December 2018

"..स्मृती ठेवुनी जाती.."

कवि-गीतकार मंगेश पाडगावकर!
मराठीतील अत्यंत लोकप्रिय कवि आणि गीतकार मंगेश पाडगावकर हे जग सोडून गेल्याला आता तीन वर्षें झाली! त्यांच्या आठवणीत शिर्षक ओळ मनात रुंजी घालते!
मंगेश पाडगावकरांची काव्यसंपदा त्यांच्याकडून ऐकणे हा अनोखा अनुभव असे!

'आनंदऋतू', 'गझल' ते 'जिप्सी', 'बोलगाणी' 
असे ४० च्या आसपास काव्यसंग्रह आणि.. 
मराठी चित्रपटांसाठी मंगेश पाडगावकरांनी 
गीते लिहिली.

पाडगावकरांची काव्यसंपदा पाहता ते नेहमी काळाबरोबर राहिलेले आणि त्यानुसार कायम नाविन्यपूर्ण लिहिणारे असे कालातीत कवि वाटतात! तसेच सर्व (युवासह) पिढींना भावणारे त्यांचे काव्य नवा बहर घेऊन आल्याचे जाणवते! 

म्हणूनच "लाजून हासणे.." लिहिणारे पाडगावकर कालांतराने लिहून गेले "प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं.." यात 'मराठीतून "इश्श" म्हणून प्रेम करता येतं आणि उर्दूमधून "इश्क" म्हणूनही प्रेम करता येतं' अशी भाषातीत प्रेमाची अनुभूती ते देतात! अर्थात "शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले.." हेही त्यांनी लिहिलेय!
कवि मंगेश पाडगावकर..तत्कालिन राष्ट्रपती श्री. प्रणब मुखर्जीं कडून 'पद्मभूषण' पुरस्कार स्वीकारताना!


"शब्द शब्द जपून ठेव.." अशी काव्यरचना करणाऱ्या मंगेश पाडगावकरांना.. 'साहित्य अकादमी' पुरस्कारा बरोबरच 'महाराष्ट्र भूषण' व 'पद्मभूषण' पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. 'विश्व मराठी साहित्य संमेलना'चे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले!

"शुक्र तारा मंद वारा.." हे अरुण दातेंनी गायलेलं आणि "माझे जीवन गाणे.." हे पं. जितेंद्र अभिषेकींनी गायलेलं अशी पाडगावकरांची गीते मनात रुंजी घालतात!

मात्र ते "या जन्मावर..या जगण्यावर शतदा प्रेम करावे." असे सांगून आपल्यातून निघून गेलेत!
त्यांना ही विनम्र भावांजली!!

- मनोज कुलकर्णी

Wednesday 26 December 2018

मग्रूर कलाकाराची पाठराखण असामान्य दिग्दर्शक 'समजणाऱ्या' शिष्ठाने पुण्यातल्या आशियाई चित्रपट महोत्सवात परवा केली!


पण धर्मनिरपेक्ष मानवतेवर बोलण्यासाठी आधी माणूसपण असावे लागते!

Thursday 20 December 2018

प्रथितयश चित्रपटकर्ते भालकर काळाच्या पडद्याआड!

मराठी चित्रपटकर्ते यशवंत भालकर!
विविधरंगी मराठी चित्रपटकर्ते यशवंत भालकर यांचे काल अकाली निधन झाले!

कोल्हापूर मध्ये 'चित्रतपस्वी' भालजी पेंढारकर यांच्या 'तांबडी माती' सारख्या चित्रपटांतून सुरुवातीस बालकलाकार म्हणून..आणि नंतर बाबांच्याच 'जयप्रभा स्टुडिओ'त श्रमिक कामे करीत यशवंत भालकर सहाय्यक दिग्दर्शकापर्यंत पोहोचले होते!
यशवंत भालकर दिग्दर्शित 'पैज लग्नाची' (१९९७) मध्ये अविनाश नारकर आणि वर्षा उसगांवकर!

१९९७ मध्ये भालकर यांनी स्वतंत्रपणे 'पैज लग्नाची' हा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला. काही अंशी हिंदी (संजीवकुमार-मुमताज़ अभिनीत) 'खिलौना' धर्तीच्या या चित्रपटात अविनाश नारकर व वर्षा उसगांवकर यांनी अप्रतिम भूमिका साकारल्या होत्या. यास 'सर्वोत्कृष्ट चित्रपटा'सह १४ राज्य पुरस्कार मिळाले. त्या सोहळ्यास मी उपस्थित होतो!
यशवंत भालकर यांच्या 'सत्ताधीश' (२०००) मध्ये कुलदीप पवार व ऐश्वर्या नारकर!

यानंतर १९९९ मध्ये भालकरांच्या 'घे भरारी' चित्रपटाने 'व्ही. शांताराम पुरस्कार' मिळवला. यानंतरचा  'सत्ताधीश' (२०००) हा त्यांचा 
चित्रपट म्हणजे एक राजकीय थरार होता! 

मग 'राजमाता जिजाऊ' ते 'लेक लाडकी' असे सुमारे १३ मराठी चित्रपट भालकरांनी २०१३ 
पर्यंत दिग्दर्शित केले. त्याचबरोबर 'पडद्या मागचा सिनेमा' सारखी पुस्तकेही लिहिली!

तसेच सलग दोन वर्षें यशवंत भालकर हे.. 'अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा'चे अध्यक्ष होते!

त्यांस अभिवादन!!

- मनोज कुलकर्णी 
  ['चित्रसृष्टी']

Friday 14 December 2018

'गदिमा' नावाशी ऋणानुबंध!

चित्रपट पत्रकारितेबरोबरच पूर्वी मी एक कॉर्पोरेट मॅगझिनही संपादित करीत होतो. त्यास माझ्या दशकभराच्या कारकिर्दीत जे पुरस्कार मिळाले..त्यांतला प्रतिष्ठेचा म्हणजे 'गदिमा पुरस्कार'! वीस वर्षांपूर्वी तत्कालिन मराठी संमेलनाध्यक्ष प्रसिद्ध कादंबरीकार ना. स. इनामदार यांच्या हस्ते ह्या पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आले!

- मनोज कुलकर्णी

गदिमांस वंदन!

श्रेष्ठ लेखक-कवी-गीतकार-अभिनेते व पटकथाकार..'पद्मश्री' प्राप्त ग. दि. माडगुळकर!
श्रेष्ठ लेखक, कवी, गीतकार, अभिनेते व पटकथाकार..'पद्मश्री' प्राप्त ग. दि. माडगुळकर यांची आज पुण्यतिथी! 
त्यांना हे जग सोडून आता ४० वर्षं होऊन गेली!
तरुण तडफदार लेखक ग. दि. माडगुळकर!

मराठी चित्रपटांच्या (विशेषतः दिग्दर्शक राजा परांजपे, संगीतकार सुधीर फडके व गदिमा ह्या प्रसिद्ध त्रिकुटाच्या) सुवर्ण काळात सुमारे १५७ चित्रपटांसाठी त्यांनी लेखन केले आणि विविध असंख्य अर्थपूर्ण गीतेही लिहिली..त्याचबरोबर २३ हिंदी चित्रपटांसाठीही त्यांनी लिहिले!

"दैव जाणिले कुणी.." व "पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.." सारखी सर्वकालीन भावार्थ असणारी आणि "अजब तुझे सरकार.." सारखी समकालीन संदर्भ असणारी त्यांची गीते अविस्मरणीय!

त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!!

- मनोज कुलकर्णी




मराठी चित्रपटांच्या सुवर्ण काळातील त्रिकुट! (दिग्दर्शक राजा परांजपे, 
संगीतकार सुधीर फडके व 
लेखक ग. दि. माडगुळकर)

Sunday 9 December 2018

पूर्वीचा 'नटसम्राट' पुन्हा होईल?

निराशाजनक 'नटसम्राट' चित्रपट!

तात्यासाहेब शिरवाडकरांची अभिजात नाट्यकृती 'नटसम्राट' २०१६ मध्ये रुपेरी पडद्यावर आली होती..महेश मांजरेकर दिग्दर्शित व नाना पाटेकर अभिनीत!..
तो शिवराळ नटसम्राट पाहून घोर निराशा झाली होती!

माझ्या स्मृतीपटलावर कोरले गेलेय ते फार वर्षांपूर्वी पाहिलेले 'नटसम्राट' नाटक..ज्यात शिर्षक भूमिका गणपतराव बेलवलकर साकारली होती दिग्गज कलावंत दत्ता भट यांनी आणि पत्नी कावेरीची भूमिका साकारली होती वात्सल्यमूर्ती शांता जोग यांनी. "माझं जरा ऐकायचं.." अशा त्यांच्या करुण आर्जवेला "सरकार.." म्हणून आर्त साद देणारे ते नटसम्राट...काळीज पिळवटून टाकणारे होते!

आशा आहे कुणी हृदय 'नटसम्राट' पडद्यावर साकारेल!!

- मनोज कुलकर्णी

Saturday 8 December 2018

स्त्री-मुलींबद्दल वाह्यात बरळलेल्या सत्ताधारी प्रवक्त्यास एका मराठी वृत्त वाहिनीवर चर्चेत सहभागी झालेले पाहून खेद वाटला!

'मराठी बिग बॉस' विनर (गुर्मीत राहिल्याने)..

'हिंदी बिग बॉस' मधून बाहेर!

Friday 7 December 2018

संगीत रंगभूमीवरील अध्वर्यू..जयराम शिलेदार!

संगीत रंगभूमीचे श्रेष्ठ कलावंत जयराम शिलेदार!

संगीत रंगभूमीस समर्पित श्रेष्ठ कलावंत जयराम शिलेदार यांची आज 
१०२ वी जयंती!

संगीत रंगभूमीवर सूर्यास्त झालेला नव्हता अशा त्या (साधारण तीस वर्षांपूर्वीच्या) काळात त्या संगीताभिनयी किरणांची अनुभूती मला आली!

विशीच्या आतच चित्रपट पत्रकारितेत लिहिता झालेल्या मला अचानक शिलेदार मंडळींच्या (गोनीदां लिखित) 'संगीत मंदोदरी' नाटकास समीक्षेसाठी जावे लागले नि साक्षात जयराम शिलेदारांशी संवादाचा सुवर्णयोग आला!

'लोकशाहीर रामजोशी' (१९४७) चित्रपटात जयराम शिलेदार!





चहा पिता पिता (त्यांच्या पारिवारिक) "नाना" म्हणून त्यांच्याशी संवाद कसा साधता आला याचे मलाच आश्चर्य वाटले..इतका मार्दवयुक्त जिव्हाळा! नंतर त्यांच्या कुटुंबियांचे संगीत रंगभूमीवरील काम पाहता आले..विशेषतः त्यांच्या कन्या कीर्ती शिलेदार यांचा बहारदार संगीताभिनय!!

'स्वयंवर', 'शाकुंतल', 'सौभद्र', 'मानापमान' व 'संशयकल्लोळ' सारख्या संगीत नाटकांबरोबरच जयराम शिलेदार यांनी 'लोकशाहीर रामजोशी' (१९४७) व 'जीवाचा सखा' (१९४८) सारख्या चित्रपटांतूनही सुरेख भूमिका साकारल्या! 


'रामजोशी' तील "सुंदरा मनामध्ये भरली.." ही त्यांनी झोकात पेश केलेली लावणी अजूनही कानात रुंजी घालतेय!

शिलेदार नानांस विनम्र अभिवादन!!


- मनोज कुलकर्णी

Saturday 24 November 2018

गर्दिश में तारें रहेंगे सदा..! 

- मनोज कुलकर्णी


'आर.के.स्टुडिओ' कपूर परिवार विकणार असल्याची बातमी या वेळी धक्का देऊन गेली!..मागच्या वर्षीच तिथे आगीची दुर्घटना घडली होती..आणि त्यांच्या अभिजात चित्रपटांच्या वस्तु स्वरुपात असणाऱ्या गोष्टी त्यांत नष्ट झाल्या असतील याने हळहळ वाटली! त्याचबरोबर 'आर.के.' च्या संगीतप्रधान प्रणयपटांची दृश्ये स्मृतिपटलावर तरळली!

आपल्या चित्रकृतींचे वैशिष्ट्य राज कपूर ने 'आर.के. फिल्म्स' च्या प्रतिका मध्ये खूबीने दर्शविले होते..जे त्याच्या पहिल्या हिट 'बरसात' चित्रपटातील दृश्यावरून घेतले होते..ज्यात राज कपूर च्या एका हातात झुलणारी नर्गिस आणि दुसऱ्या हातात व्हायोलिन होते..म्हणजे प्रणय आणि संगीत ही 'आर.के.' च्या चित्रपटाची ओळख! 'आर.के. स्टुडिओ' च्या प्रवेशद्वाराजवळ हे कायम दीमाखत उभे राहिले!

राज कपूरची पडद्यावरील 'आग' (१९४८) अखेर स्टुडिओपर्यंत आली!
देश स्वतंत्र झाल्यानंतर..१९४८ मध्ये राज कपूर ने मुंबईत चेंबूर येथे 'आर.के. स्टुडिओ 'ची स्थापना केली आणि पहिला चित्रपट केला.. 'आग'! (अजब योगायोग म्हणजे सुमारे सात दशकांनंतर स्टुडिओ सिस्टिम चा अस्त झाल्यावर त्यास प्रत्यक्षात ती लागणें!)
तर ती पहिली 'आग' लगेच विझली..म्हणजेच 'आर.के.' चा तो पहिला चित्रपट चालला नाही! यांत कामिनी कौशल आणि नर्गिस बरोबर राज कपूर ने रंगभूमीशी समर्पित भूमिका वठवली होती!
'आर.के. फिल्म्स' चे प्रतिक झालेले 'बरसात' (१९४९) चे राज कपूर च्या 
एका हातात झुलणारी नर्गिस आणि दुसऱ्या हातात व्हायोलिन हे दृश्य!

१९४९ मध्ये 'आर.के.' ने संगीत नि प्रेम यांवर आपला 'बरसात' हा यशस्वी चित्रपट निर्माण केला..याची कथा लिहिली होती..(प्रसिद्ध चित्रपटकर्ते) रामानंद सागर यांनी! इथूनच 'आर.के.' ला संगीत साथी मिळाले.. गीतकार शैलेन्द्र, हसरत जयपुरी आणि संगीतकार शंकर-जयकिशन..अन त्याचा आवाज मुकेश! त्याचबरोबर यातील "मुझे किसीसे प्यार हो गया.." सारखी गाणी गाणारी लता मंगेशकर!


चेंबूर येथे अंदाजे दोन एकर जागेत 'आर.के. स्टुडिओ'ची उभारणी झाली होती आणि १९५० मध्ये तेथील मुख्य इमारतीचे बांधकाम झाले..या मागेच राज कपूरची कॉटेज होती आणि तिथे तो चित्रपट निर्मिती संदर्भात बैठका घेत असे! (नर्गिस ची ड्रेसिंग रूम ही तिथेच होती!) तसेच या परिसरात विविध समारंभ आयोजिले जाऊ लागले..जसा स्टुडिओचा गणेशोत्सव आणि 'आर.के' च्या प्रसिद्ध होळीचे रंगही इथेच खेळले जाऊ लागले!

खरं तर 'भारतीय सिनेमा चा चार्ली चॅप्लिन' ही ओळख होती अभिनेता राज कपूर ची पडद्यावर..जी त्याने आपल्या 'आवारा' (१९५१) चित्रपटात 'चार्ली ट्रॅम्प' वर चालत राखली! तर त्याचा आवाज बनलेल्या मुकेश ने गायलेले याचे शिर्षक गीत रशियापर्यंत निनादत राहिले आणि राज कपूर तिथे फेमस झाला! यातही नर्गिस ही राज कपूर ची नायिका होती..बिघडलेल्या आवारास प्रेमाने सुधारणारी तिची सुंदर भूमिका यात होती! यातले स्वप्नदृश्य भारतीय चित्रपट इतिहासात प्रसिद्ध आहे..यात नर्गिस (प्रेम) अप्सरा रुपात स्वर्गातून खाली येते आणि राज कपूर तिच्या पायाशी आक्रोश करतो "ये नहीं हैं, ये नहीं हैं जिंदगी..मुझको चाहीए बहार.."
'आवारा' (१९५१) चित्रपटातील  स्वप्नदृश्यात राज कपूर व नर्गिस!

राज कपूर आणि नर्गिस असे सुमारे १५ चित्रपटांतून एकत्र नायक-नायिका म्हणून आले. याचे कारण दर्शकांना भावलेला त्यांच्यातील उत्कट भावाविष्कार! एकत्र काम करण्याबरोबरच राज कपूरने नर्गिस बरोबर जगभर फिरून आपल्या 'आर.के. स्टुडिओ' च्या चित्रपटांचा प्रसार केला. यांमध्ये साम्यवादाच्या पार्श्वभूमीवरील गरीब नायकाच्या प्रतिमेने त्याचे चित्रपट सोविएत/राशियात अधिक लोकप्रिय झाले!..नर्गिस ने मात्र 'श्री ४२०' व 'जागते रहो' नंतर 'आर.के. फिल्म्स' मध्ये काम केले नाही!

'श्री ४२०' मध्ये 'चार्ली स्टाईल' राज कपूर!
दरम्यान 'इटालियन नव-वास्तववाद' ने प्रेरित होऊन 'आर.के.' चे दोन चित्रपट बनले; पण त्यांचे दिग्दर्शन दुसऱ्यांनी केले..ज्यामध्ये (डी सिकां च्या चित्रपटांतून स्फूर्ती घेऊन निर्माण केलेले) 'बूट पॉलिश' (१९५४) प्रकाश अरोरा ने आणि 'जागते रहो' (१९५६) शंभु मित्रा ने दिग्दर्शित केले! यांचे वास्तववादी चित्रीकरण करणाऱ्या राधु कर्माकरने 'आर.के.' च्या शेवटच्या चित्रपटापर्यंत त्यांची सिनेमॅटोग्राफी केली. यांत विशेषत्वाने नमूद करायचे म्हणजे 'आर.के.' निर्मित 'जिस देश में गंगा बहती हैं' (१९६०) चे दिग्दर्शन कर्माकरने केले! आणि यात राज कपूर बरोबर नर्गिस च्या जागी दाक्षिणात्य अभिनेत्री पद्मिनी आली!
'जिस देश में गंगा बहती हैं' (१९६०) त राज कपूर!

१९६४ मध्ये 'आर.के.' ने पहिला रंगीत चित्रपट केला 'संगम'..जो मेहबूब खान यांच्या अभिजात 'अंदाज़' (१९४९) चा (प्रेमी त्रिकोण) प्लॉट घेऊन आला..आणि 'मेहबूब स्टुडिओ' बरोबरच त्याने हा निर्माण केला होता! यात वैजयंतीमाला आणि राजेंद्र कुमार बरोबर राज कपूर ने मूळ भूमिकाच परत केली होती! याचे चित्रीकरण त्याने विदेशातही केले. इथूनच स्वित्झर्लंड सारख्या फॉरेन लोकेशन वर हिंदी चित्रपटांच्या गाण्यांचे चित्रीकरण करणे सुरु झाले!
'संगम' (१९६४) मध्ये राज कपूर, वैजयंतीमाला आणि राजेंद्र कुमार!

यानंतर नायक म्हणून राज कपूर चा 'मेरा नाम जोकर' (१९७०) अपयशी ठरला! सर्कसमधील जोकरच्या रूपकातून त्याने हास्य कलाकाराची कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला. के.ए. अब्बास यांनी याचे पटकथा लेखन केले होते. यांत त्याच्या बरोबर पद्मिनी, सिम्मी गरेवाल आणि सुंदर सोवियत/रशियन कलाकार क्सेनिया रॅबिनकिना होती! या चित्रपटाच्या लांबीमुळे त्यावेळी दोन मध्यान्तरे ठेवण्यात आली होती.

'कल आज और कल' (१९७१) मध्ये पृथ्वीराज कपूर, राज कपूर व रणधीर कपूर!
मग तिन पिढ्यांतील संघर्ष दर्शवणाऱ्या 'कल आज और कल' (१९७१) मध्ये पिता पृथ्वीराज कपूर आणि नायक बनलेला पुत्र रणधीर कपूर यांबरोबर प्रौढ़ भूमिकेत राज कपूर पडद्यावर आला! याचे दिग्दर्शनही रणधीरने केले होते आणि यात त्याच्या बरोबर त्याची पत्नी बबीता होती! यापूर्वी 'आवारा' मध्ये पृथ्वीराज कपूर यांनी राज च्या पित्याची भूमिका केली होती. तसे नंतर ते 'आर. के.' च्या प्रत्येक चित्रपटात (श्रेयनामावली आधी) सुरुवातीला पूजा करताना दिसले!


'बॉबी' (१९७३) मध्ये ऋषि कपूर आणि षोडश सुंदर डिंपल कपाडिया!
१९७३ मध्ये राज कपूर ने आपला दुसरा मुलगा ऋषि कपूर आणि षोडश सुंदर डिंपल कपाडिया ला घेऊन 'बॉबी' हे युवा प्रेमाचे उत्कट चित्र सादर केले आणि हा चित्रपट सुपरहिट झाला! इथे लक्ष्मीकांत-प्यारेलाल संगीतकार म्हणून 'आर.के. फिल्म्स' मध्ये आले आणि शैलेन्द्र सिंग सारख्या नवख्याने गायलेली आनंद बक्षी ची "मै शायर तो नहीं, मगर ए हसीं..जबसे देखा मैंने तुझको.." अशी यातील रूमानी गाणी हिट झाली!

'बॉबी' चे काही चित्रीकरण पुण्यात आणि लोणी येथे झाले. तसे राज कपूर च्या बहुतेक चित्रपटांचे काही चित्रीकरण या भागांत झालेय!
'सत्यम शिवम् सुंदरम' (१९७८) मध्ये शशी कपूर आणि झीनत अमान!

यानंतर 'आर.के' ने काही संवेदनशील नि सामाजिक विषयांवर चित्रपट बनवले.. ज्यांचे लेखन जैनेन्द्र जैन ने केले होते. यांत 'सत्यम शिवम् सुंदरम' (१९७८) हा शारीरिक सुंदरतेच्या पलीकडे जाऊन कलेची सुंदरता पारखणारा होता आणि यात राज बंधु शशी कपूर बरोबर झीनत अमान ने आव्हानात्मक भूमिका उत्तम साकारली होती!

तर 'आर.के.' चा पुढचा 'प्रेमरोग' (१९८२) हा विधवेशी प्रेम नि विवाह असा नाजुक धागा घेऊन आला होता  आणि यात ऋषि कपूर बरोबर पद्मिनी कोल्हापुरे ने ती विधवा कुमारिका समजुन-उमजुन संयतपणे साकारली होती! या चित्रपटांचे चित्रीकरणही लोणी तील राजबागेत झाले होते!
'राम तेरी गंगा मैली' (१९८५) मध्ये राजीव कपूर आणि मंदाकिनी!

मग आपल्या तिसऱ्या मुलास राजीव कपूर ला नायक बनविणारा 'राम तेरी गंगा मैली' (१९८५) हा शेवटचा चित्रपट राज कपूर ने निर्माण केला..इथे ही गंगा रूपक म्हणून वापरण्यात आली होती आणि त्याद्वारे समाजातील निराधार 
(कुमारी माता) स्त्रीचे 
शोषण दाखविण्यात आले! यात मंदाकिनी (मूळ यास्मिन) ने ती व्यक्तिरेखा संवेदनशीलपणे साकारली! 
या यशस्वी चित्रपटातील रविंद्र जैन यांची अर्थपूर्ण गाणी गाजली!

'आर. के.' च्या चित्रपटांस अनेक पुरस्कार मिळाले..यांत ३ राष्ट्रीय सन्मान आणि ११ फ़िल्मफ़ेअर अवॉर्ड्स यांचा समावेश होतो. त्याचबरोबर 'कान्स' सारख्या चित्रपट महोत्सवांतून गौरविले गेले..तर 'जागते रहो' चित्रपटास प्रतिष्ठेच्या 'कार्लोवी वेरी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'त 'क्रिस्टल ग्लोब' अवॉर्ड मिळाले! याच बरोबर भारत सरकारने राज कपूरला १९७१ मध्ये 'पद्मभूषण' आणि १९८७ मध्ये 'दादासाहेब फाळके पुरस्कारा'ने गौरविले!
'हीना' (१९९१) मध्ये ऋषि कपूर आणि (पाकिस्तानी) सुंदर झेबा बख़्तियार!

मला आठवतंय 'आर. के. स्टुडिओ' मध्ये माझे १९८९-९० दरम्यान जाणे..त्या सुमारास तिथे बाहेरील चित्रपटांचेही चित्रीकरण होऊ लागले होते..एकदा तिथे स्पेशल इफेक्टस साठी ख्याती असलेले बाबुभाई मिस्त्री दिग्दर्शित 'हातिमताई और सात सवाल' (१९९०) या पोषाखी-जादुई चित्रपटाचे चित्रीकरण चालू होते..जितेंद्र, संगीता बिजलानी आणि सतीश शाह यांच्या प्रमुख भूमिका त्यात होत्या..ते पाहून त्यांच्याशी बोलल्यावर मी स्टुडिओ मध्ये फेरफटका मारला..तेंव्हा 'आर. के. फिल्म्स' च्या अनेक स्मृति वस्तुरूपांत ठिकठिकाणी आढळल्या..यांत 'आर. के.' च्या सर्व चित्रपटांची पोस्टर्स मुख्य इमारतीत सर्वत्र लावलेली, 'आवारा' चे स्वप्नदृश्य चित्रित झालेले सेट्स, राज-नर्गिस च्या 'श्री ४२०' मधील प्रसिद्ध "प्यार हुआ इकरार हुआ हैं.." गाण्यात वापरलेली मोठी काळी छत्री आणि 'बॉबी' ची मोटरसायकल पण होती!
'आ अब लौट चले' (१९९९) मध्ये अक्षय खन्ना व ऐश्वर्या राय!

राज कपूर च्या निधनानंतर त्यांच्या महत्वाकांक्षी 'हीना' (१९९१) चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांचा मोठा मुलगा रणधीर कपूर ने केले. के.ए. अब्बास यांनी लिहिलेली ही भारत-पाकिस्तान च्या पार्श्वभूमीवरील तरल प्रेम कहाणी होती. यांत दुसरा मुलगा ऋषि कपूर नायक होता; तर पाकिस्तानी अभिनेत्री झेबा बख़्तियार ने शिर्षक भूमिका लाजवाब साकारली! 

नंतर तिसरा मुलगा राजीव कपूर ने 'प्रेम ग्रंथ' (१९९६) दिग्दर्शित केला..ज्यात ऋषि कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या भूमिका होत्या. त्यानंतर नव्या पिढीचा नायक अक्षय खन्नास ऐश्वर्या राय बरोबर पेश करीत ऋषि कपूर ने दिग्दर्शनात पाउल टाकले ते 'आ अब लौट चले' (१९९९) द्वारे! पण हे दोन्ही चित्रपट फारशी चमक दाखवू शकले नाहीत!
कपूर नवी पीढ़ी..करीना कपूर, रणबीर कपूर आणि करिश्मा कपूर!

अशी या 'शोमन आर. के.' ची मुले 'आर. के. स्टुडिओ' ची जबाबदारी पार पाडत असताना..गेल्या वर्षी आगीचा हादसा झाला..आणि त्यांतून सावरून ते चित्रपट निर्मितीची परंपरा चालू ठेवतील असे वाटत असतानाच..'आर.के.स्टुडिओ' ते विकणार असल्याची धक्कादायक बातमी येऊन गेली!
'मेरा नाम जोकर' (१९७०) मध्ये राज कपूर!

अजूनही आशा ठेवूया की 'आर.के.' च्या नव्या पिढीचे (रणबीर कपूर सारखे) यांतून काही चांगला मार्ग काढतील!..नाहीतर अस्तास जाताना स्टुडिओ म्हणेल..

"कल खेल में हम हो न हो..गर्दिश में तारें रहेंगे सदा.."
 भुलेंगे तुम भूलेंगे वो..पर हम तुम्हारे रहेंगे सदा...!"

- मनोज कुलकर्णी
   ['चित्रसृष्टी']

Thursday 8 November 2018

जन्मशताब्दी विशेष:

पु.ल. : अष्टपैलु कलासक्त व्यक्तिमत्व!


'महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व'..पु. ल. देशपांडे!


मराठी साहित्य आणि वक्तृत्व, नाट्य, चित्रपट, संगीत अशा सर्व क्षेत्रांत समरसून संचार केलेले मार्मिक नि मिश्किल व्यक्तिमत्व म्हणजे पु. ल. देशपांडे!..त्यांची जन्मशताब्दी आता सुरु झाली..आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर सुरु झालेल्या त्यांच्या चित्रपट कारकिर्दीसही सत्तर वर्षे होऊन गेली! तेंव्हा या प्रसंगी त्यावर इथे प्रकाशझोत टाकीत आहे..
"इथेच टाका तंबू.." या 'गुळाचा गणपती' (१९५३) 
मधील गाण्यात पु.ल. देशपांडे!

१९४७ मध्ये मो. ग. रांगणेकर यांच्या 'कुबेर' चित्रपटाद्वारे पु. ल. देशपांडे यांचे रूपेरी पडद्यावर पदार्पण झाले. यांत प्रमुख भूमिकेबरोबरच श्रीधर पार्सेकर यांच्या संगीतात ते गायलेही! त्यानंतर १९४८ मध्ये 'भाग्यरेशा' (१९४८) या शांताराम आठवले दिग्दर्शित चित्रपटात त्या काळातील आघाडीची अभिनेत्री शांता आपटे बरोबर त्यांनी नायक म्हणून भूमिका रंगवली! याच वर्षी राम गबाले यांच्या 
'वंदे मातरम' चित्रपटात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली आणि विशेष म्हणजे त्यांच्या बरोबर यात होत्या..पत्नी सुनीताबाई देशपांडे!

१९४९ साली पु. ल. देशपांडे यांनी 'मानाचे पान' चित्रपटाची कथा, पटकथा व संवाद..श्रेष्ठ लेखक ग. दि. माडगुळकर यांच्याबरोबर प्रथमच लिहिले आणि 'मोठी माणसे' या चित्रपटाने ते संगीत सुद्धा देऊ लागले! १९५० मध्ये 'जोहार मायबाप' या सामाजिक चित्रपटातील त्यांची भूमिका ही वैशिष्ट्यपूर्ण होती; तर याच वर्षी कथा, पटकथा व संवाद लेखनाबरोबरच 'पुढचे पाऊल' या प्रबोधनपर चित्रपटात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली!
'जोहार मायबाप' (१९५०)  चित्रपटात पु.ल. देशपांडे व सुलोचना!


१९५२ मध्ये तर 'दूध भात' या चित्रपटाची कथा, पटकथा व संवाद लेखनाबरोबरच गीतेही त्यांनी लिहिली व संगीतही दिले..आणि इथूनच 'सबकुछ पु. ल.' सुरु झाले!  याच वर्षी 'संदेश' या हिंदी चित्रपटसाठी त्यांनी कथा-पटकथा लेखन केले..जे मीर असग़र अली यांनी अनुवादित केले होते! याच सुमारास राम गबाले यांचा बालमनाचा ठाव घेणारा 'देवबाप्पा' हा हृदय चित्रपट आला..ज्याचे लेखन पुलंनी केले होते आणि त्यांच्याच संगीतातील त्यांचे गाजलेले बालगीत "नाच रे मोरा आंब्याच्या वनात.." त्यातील बालनायिका मेधा गुप्तेने लोभसवाणे साकार केले होते!
'गुळाचा गणपती' (१९५३) चित्रपटाच्या पोस्टर मध्ये चित्रा व पु.ल. देशपांडे!

१९५३ मध्ये त्यांचा बहुचर्चित गाजलेला चित्रपट आला 'गुळाचा गणपती' ज्यात पु.ल. सर्वव्यापी होते! एका नाट्यवेड्या भोळ्याभाबड्या माणसाचा समाजकंटक राजकीय फायद्यासाठी कसा वापर करतात असे याचे कथासूत्र होते. ही मध्यवर्ती भूमिका भावभावनांचे अनेक कंगोरे दाखवीत पुलंनी लाजवाब साकारली. यात त्यांच्या बरोबर नायिका म्हणून समरसून काम केले ते त्या काळातील सोज्वळ अभिनेत्री चित्राने! हा चित्रपट..मराठी चित्रपट इतिहासातील एक मानदंड म्हणता येईल!

१९६० मध्ये राम गबाले यांच्या 'फूल और कलियाँ' या हिंदी चित्रपटाचे लेखन ही त्यांनी केले..ज्यास 'सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटा'चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला! यानंतर 'आज और कल' (१९६३) या वसंत जोगळेकर यांच्या हिंदी चित्रपटाचे लेखनही त्यांनी केले..ज्यात संवाद अख्तर-उल-इमान यांनी लिहिले होते! यांत सुनिल दत्त, नंदा व अशोक कुमार असे बिनीचे कलावंत होते! यानंतर तीन दशकांनी.. 
'एक होता विदुषक' (१९९३) हा डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपट त्यांच्या लेखनावर आला..ज्यात लक्ष्मीकांत बेर्डे ने ती भूमिका अफलातून साकारली! या चित्रपटास राज्य व राष्ट्रीय पुरस्कार लाभले!
पत्नी सुनीताबाईंसमवेत एका प्रसन्न क्षणी पु. ल. देशपांडे!


पु. ल. देशपांडे यांना अनेकविध पुरस्कार मिळाले. त्यांत 'साहित्य अकादमी', 'संगीत नाटक अकादमी' आणि 'महाराष्ट्र भूषण' व केंद्र सरकारचा 'पद्मभूषण' यांचा विशेषत्वाने समावेश होतो!

पु. ल. देशपांडे यांची मिश्किल व्याख्याने व परिसंवादातील मार्मिक भाष्य समोर बसून ऐकल्याचे..आणि त्यांना समारंभातून भेटल्याचे क्षण आज आठवतयत!!

त्यांना ही शब्द-सुमनांजली!!


- मनोज कुलकर्णी
  ['चित्रसृष्टी']

Wednesday 31 October 2018

स्वरमय स्मृती ठेवूनी जाती!

दिग्गज सुगम गीत-संगीतकार यशवंत देव!

"जीवनात ही घडी अशीच राहू दे.."

असे आपल्या स्वरमय जीवनगीतात तल्लिन राहिलेले दिग्गज सुगम गीत-संगीतकार यशवंत देव अखेर हे जग सोडून गेले!
यशवंत देव आणि अभिजात संगीतकार अनिल बिस्वास!

यशवंत देव यांचे "जीवनात ही घडी अशीच राहू दे.." हे 
लता मंगेशकर यांनी गायलेले गाणे साकार करताना सुजाता!
स्वतः गीतलेखन करीत असल्याने यशवंत देव यांचे संगीत हे शब्दप्रधान होणे स्वाभाविकच होते; म्हणूनच मंगेश पाडगावकर आणि ग्रेस यांसारख्या कवींच्या गीतांनाही त्यांनी भावगर्भ स्वरसाज चढविला! यांत कवि अनिल यांचे "नको जाऊ कोमेजुन माझ्या प्रितीच्या फुला.." आणि मंगेश पाडगांवकर यांचे "दिवस तुझे हे फुलायचे.." अशी तरल प्रेमगीते होती; तर कुसुमाग्रजांचे "काही बोलायचे आहे.." आणि ग्रेस यांचे "हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद स्वराने.." सारखी आर्त भावपूर्ण गीते होती!

यशवंत देव यांची स्वतःचीही गीते संवेदशील होती..ज्यांत होते "माणसांच्या गर्दीत माणूस माणसाला शोधत आहे.." आणि "अशी धरा असे गगन सजेल का..?" सारखा आशावाद! तर त्यांनी चित्रपटांसाठी संगीतबद्ध केलेली गाणीही गाजली..ज्यांत "येशील येशील येशील राणी.." हे वसंत बापट यांचे होते. त्यांची अनेकविध गाणी अरुण दाते ते अगदी फडके नि मंगेशकरांनी गायली. त्यांच्यावर भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिजात संगीतकार अनिल बिस्वास यांचा प्रभाव होता!

यशवंत देव यांना अनेक मानसन्मान मिळाले. यांत 'गादिमा पुरस्कार' आणि 'लता मंगेशकर पुरस्कार' यांचा विशेषत्वाने समावेश होतो!

त्यांच्यावर आचार्य रजनीश (ओशो) यांच्या तत्वज्ञानाचाही प्रभाव होता..याची प्रचिती त्यांच्या जीवनाविषयीच्या काही गाण्यांतून प्रकर्षाने येते..ज्यांत "विश्वाचा खेळ मांडिला आम्ही.." सारखी त्यांची होती; तर काही त्यांनी संगीतबद्ध केलेली पाडगांवकरांची "या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.."

त्यांस श्रद्धांजली वाहताना त्यांचे हृदय गाणे आठवते..
"अशी पाखरें येतीं आणिक स्मृती ठेवूनी जाती.."

- मनोज कुलकर्णी
   ['चित्रसृष्टी']

Sunday 28 October 2018

मराठी रंगभूमी-चित्रपटाच्या सुवर्णकाळातील स्टार!

डॉ. काशिनाथ घाणेकर..मराठी रंगभूमी-चित्रपटाच्या सुवर्णकाळातील स्टार!

'मधुचंद्र' (१९६७) मध्ये "सुरावटीवर तुझ्या." गीतात डॉ. काशिनाथ घाणेकर व उमा!

'आधार' (१९६९) मधील "माझ्या रे प्रीती फुला.." गीतात डॉ. काशिनाथ घाणेकर व अनुपमा!
'गारंबीचा बापू' (१९८०) चित्रपटात गीता सिद्धार्थ व डॉ. काशिनाथ घाणेकर!
"अल्ला जाने क्या होगा आगे!"
'मधुचन्द्र' या चित्रपटात आपले भुरे केस मागे उडवीत लोभस नायिका उमा कडे प्रेमाचा कटाक्ष टाकीत हिंदीतील हा डायलॉग फेकणारा तो प्रेमवीर म्हणजे डॉ. काशिनाथ घाणेकर! 'संवादफेक' ही क्रिया शब्दशः त्यांनीच जास्त वापरली..म्हणूनच 'डायलॉग फेकणारा' असेच इथे लिहिले!

तसेच हिंदीतील आपले मातब्बर अभिनेते दिलीप कुमार यांच्या कपाळावर ज्याप्रमाणे केस रूळत..तसेच काहीसे डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या बाबतीत होते आणि बोलताना मोठया ऐटीत ते आपले केस मागे घेत! त्याचबरोबर त्यांच्या भराभर बोलण्यात एक दिलखेचक लय असे..काहीशी हिंदीतील प्रसिद्ध प्रणयी नायक देव आनंद च्या एका दमात संवाद म्हणणारी; पण आवाजात भावगर्भता असे! निळसर डोळ्यांत एक प्रकारची बेफ़िकीरी दिसून येई!

 

हे आठवण्याचे कारण म्हणजे '..आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' नामक मराठी चित्रपट येऊ घातल्याचे कळले..आणि त्याचा प्रोमो पाहताना त्यांच्या वैशिष्ठ्यपूर्ण अभिनयातील व्यक्तिरेखा डोळ्यासमोर तरळल्या!

पेशाने डॉक्टर असणारे काशिनाथ घाणेकर हे डेंटल सर्जन होते; पण आपल्याकडे कलेवरील प्रेमाखातर रंगभूमी आणि चित्रपटाकडे डॉक्टरांचे वळणे हा जणू प्रघात..त्यानुसारच अभिनयाची उत्तम जाण असलेले तेही या कला क्षेत्रांकडे आले! यांत रंगभूमीवर 'अश्रुंची झाली फुले' आणि 'रायगडाला जेंव्हा जाग येते' सारख्या दर्जेदार नाटकांतुन त्यांनी लाजवाब भूमिका साकारल्या आणि रूपेरी पडद्यावर श्र. ना. पेंडसे यांचा 'गारंबीचा बापू' बेमालूम साकारला!


'दादी माँ' (१९६६) या हिंदी चित्रपटात डॉ. काशिनाथ घाणेकर आणि तनुजा!

तसे १९५३ मध्ये 'धर्म पत्नि' या मराठी चित्रपटाद्वारे डॉ. काशिनाथ घाणेकर पडद्यावर आले. त्यानंतर 'पाठलाग' (१९६०) सारख्या चित्रपटांतून त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण भूमिका साकारल्या. यांत भालजी पेंढारकरांच्या 'मराठा तितुका मिळवावा' (१९६४) मध्ये घोड्यावर बसून "शूर आम्ही सरदार.." असे गात रूबाबात जाणारी त्यांची व्यक्तिरेखा सर्वांनाच भावली!  

पण प्रमुख नायक म्हणून त्यांस प्रसिद्धी मिळाली ती 'मधुचंद्र' (१९६७) या तरल प्रेमपटातून..याचे विशेष म्हणजे कालांतराने वास्तववादी चित्रपट दिग्दर्शित करणारे राजदत्त यांचा हा पहिला आणि उत्तम व्यवसाय केलेला चित्रपट! यात "सुरावटीवर तुझ्या उमटती.." हे प्रेमगीत काशिनाथजी व उमा यांनी उत्कटपणे साकार केले होते. माझ्या आवडत्या मराठी प्रेमपटांपैकी हे एक चित्र!  
'हा खेळ सावल्यांचा' (१९७६) मध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर व आशा काळे!

केवळ मराठी चित्रपटा पुरते डॉ. काशिनाथ घाणेकर मर्यादित राहिले नाहीत, तर १९६६ मध्ये त्यांनी अशोक कुमार व बीना रॉय यांच्या भूमिका असणाऱ्या 'दादी माँ' द्वारे हिंदी चित्रपटातही प्रवेश केला..यात "ऐ माँ तेरी सूरत से अलग भगवान की सूरत क्या होगी.." या प्रसिद्ध गाण्यात सर्वांनी त्यांस पाहिलेय! तर 'अभिलाषा (१९६८) या हिंदी चित्रपटात ते नंदा बरोबर आले!

१९७६ साली आलेल्या 'हा खेळ सावल्यांचा' या गूढरम्य मराठी चित्रपटातील डॉ. काशिनाथ घाणेकर यांची भूमिका ही तशी शेवटचीच! यातले "गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय.." हे आशा काळे बरोबरचे त्यांचे नृत्य-गीत गाजले..ज्यात हेमंत कुमार यांनी त्यांस आवाज दिला होता! १९८० पर्यंतचा वीस वर्षांचा काळ त्यांनी आपल्या अनेकविध भूमिकांनी गाजवला! मात्र १९८६ मध्ये एका नाटकाच्या दौऱ्यावर असताना ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे अकाली निधन झाले!

आपल्या आदरणीय ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनाजींच्या कन्या कांचनताई यांच्या बरोबर डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे लग्न झाले होते. त्यांनी मग 'नाथ हा माझा' हे डॉ. घाणेकर यांचे आत्मचरित्र लिहिले!

साधारण तीसएक वर्षांपूर्वी पुण्यात मराठी चित्रपट कलावंतांचे संमेलन भरले होते. त्यावेळी 'टिळक स्मारक मंदिरा' त पायजमा-हिरवा कुर्ता परिधान केलेले डॉ.काशिनाथ घाणेकर यांना मी ओझरते भेटलो! त्यावेळी भिंतीला टेकून उभे असणाऱ्या त्यांच्यात पूर्वीचा चार्म राहिला नव्हता!

त्यांच्या स्मृतीस ही शब्दांजली!!

- मनोज कुलकर्णी 
  ['चित्रसृष्टी']

Saturday 27 October 2018

नायरसाहेबांना अभिवादन!

२००२ मध्ये माझ्या 'चित्रसृष्टी' विशेषांक प्रकाशन समारंभात श्री. पी. के. नायर यांचा सत्कार करताना मी!
आज 'वर्ल्ड डे फॉर ऑडियो-विज़ुअल हेरीटेज'..म्हणजेच 'विश्व दृक-श्राव्य वारसा दिन'!

याप्रसंगी विश्व सिनेमाचे जतन करण्याचे मोलाचे कार्य केलेल्या आपल्या 'राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय' ('एन.एफ.ए.आय.') चे संस्थापक व विख्यात चित्रपट इतिहासकार..आदरणीय (दिवंगत) श्री. पी. के. नायर यांस विनम्र अभिवादन!

- मनोज कुलकर्णी

Friday 26 October 2018

शास्त्रीय गायक-संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर..८१!


पंडित हृदयनाथ मंगेशकर.

मंगेशकर संगीत परिवारातील एक दिग्गज गायक-संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा आज ८१ वा वाढदिवस!
पंडित हृदयनाथ मंगेशकर गाताना!

पिता दीनानाथ मंगेशकर आणि उस्ताद अमीर खांसाहेबांचे सांगीतिक संस्कार असलेले हृदयनाथ मंगेशकर यांचे भावगीत गायनही त्या धरतीनेच येते!
'महानंदा' (१९८५) च्या "माझे राणी माझे मोगा.." गाण्याचे दृश्य!

१९५५ साली मराठी चित्रपट 'आकाश गंगा' पासून त्यांची संगीतकार म्हणून कारकीर्द सुरु झाली आणि नंतर मराठी व हिंदी चित्रपटांस त्यांचे अभिजात संगीत लाभले!

मग 'संसार' चे "दयाघना.." असो वा 'निवडुंग' चे "केंव्हा तरी पहाटे.." आणि हिंदीतील 'धनवान' मधील "ये आँखे देखकर.." वा 'लेकिन' मधील "केसरीया बालमा.." तर 'महानंदा' च्या "माझे राणी माझे मोगा.." सारख्या गाण्यांतून त्यांनी गोव्याच्या लोकसंगीताचा चांगला वापर केला!
माता-पिता यांच्या फोटोंसह मंगेशकर बंधु-भगिनी (डावीकडून)
 उषाताई, मीनाताई, आशाताई, हृदयनाथजी व लतादीदी!

"ये रे घना.." नि "मी डोलकर.." सारखी त्यांनी संगीतबद्ध केलेली अन्य गाणीही गाजली आणि मंगेश पाडगावकर, सुरेश भट व ग्रेस यांच्या त्यांनी स्वरबद्ध केलेल्या काव्यरचनाही! तर मंगेशकर बंधु-भगिनींनी गायलेले सावरकरांचे "सागरा प्राण तळमळला.." गीत हृदयस्पर्शीच!

त्यांच्याशी झालेल्या भेटी आज आठवतायत.. यात चित्रकर्ते राम गबाले यांच्या 'हे गीत जीवनाचे' या अखेरच्या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर त्यांच्या बरोबर आम्हा समीक्षकांची रंगलेली मैफल आठवते..यात त्यांनी पार लहानपणापासून ते संगीतकार पर्यंतच्या आठवणींना उजाळा दिला होता!

मी 'चित्रसृष्टी' चा संगीत विशेषांक पं. हृदयनाथ मंगेशकरना दाखवताना!
यानंतर अलीकडे 'पिफ' मध्ये त्यांना पुरस्कार दिल्यानंतरची भेट...यात त्यांनी माझ्या 'चित्रसृष्टी' चा संगीत विशेषांक आवर्जून पाहीला!

यातील वार्तालापात प्रशंसनीय भाष्य झाल्यावर मी मनात दीर्घ काळ घोळणारा प्रश्न त्यांना विचारला "बाळासाहेब, आपण हिंदी चित्रपटांसाठी केलेली काही गाणी ही आपल्या लोकप्रिय मराठी गीतांवर आधारित आहेत...म्हणजे 'मशाल' चे "ओ होली आयी.." हे 'जैत रे जैत' च्या ''ओ जांभुळ पिकल्या.." गाण्यावर वाटते आणि 'माया मेमसाब' चे "खुद से बाते करते रहेना.." हे 'हा खेळ सावल्यांचा' च्या ''काजळ रातीनं ओढून नेला.." ची आठवण करून देते!" यावर मिश्किल हसत ते म्हणाले "एक तर संगीतातील मूळ चीज ही बदलत नाही आणि मला एखादी रचना आवडली की मी ती पुन्हा वापरतो!"

गायन-संगीताची पं. हृदयनाथ मंगेशकर यांना अनेक पारितोषिके मिळाली आणि १९९० साली 'लेकिन' चित्रपटाच्या संगीतासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला! तर २००९ मध्ये सरकार तर्फे त्यांना 'पद्मश्री' बहाल करण्यात आले!


तर अशा मंगेशकरसाहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

 
- मनोज कुलकर्णी
['चित्रसृष्टी', पुणे]