Sunday 25 December 2022

'लावणीसम्राज्ञी' गायिका सुलोचना चव्हाण!

'खानदानी ठसकेबाज लावणी गायकी लोप पावली!'

'लावणीसम्राज्ञी' म्हणून लौकीक प्राप्त वयोवृद्ध गायिका सुलोचना चव्हाण यांचं निधन झाल्याची दुःखद बातमी येताच हे भाव मनी उमटले!

मुंबईतील चाळीत लहानपणी घरच्याच मेळ्यात पूर्वाश्रमीच्या या सुलोचना कदम गात. मग रंगभूमीवर पाऊल ठेवत त्यांनी अगदी हिंदी-उर्दू नाटकांतही कामे केली! त्या काळात ग्रामोफोन ऐकूनच त्यांनी आपली गायकी तयार केली. वयाच्या नवव्या वर्षीच 'कृष्ण सुदामा' या हिंदी चित्रपटात गायची संधी त्यांना मिळाली. पुढे तर मास्टर भगवान यांच्या चित्रपटांतून "नजर से नजर लड गयी.." सारखी गाणी त्यांनी संगीतकार सी. रामचंद्र यांच्यासह गायली! मराठीसह गुजराती, पंजाबी सारख्या अन्य प्रादेशिक भाषांतील गाणीही त्या गायल्या. अगदी मन्ना डें बरोबर भोजपुरीही! त्या गझल ही गात आणि ख्यातनाम गायिका बेगम अख्तर यांनी त्याबाबत त्यांची प्रशंसा केलीये!

त्यांना असे कारकिर्दीच्या सुरुवातीसच पार्श्वगायन करायला मिळाले. मात्र त्यांनी लावणी सर्वप्रथम गायली ती १९५१ मध्ये 'हीच माझी लक्ष्मी' साठी! वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेली ही लावणी आचार्य अत्रे यांच्या या चित्रपटात हंसा वाडकर यांच्यावर चित्रित झाली होती. मग १९५३ च्या सुमारास 'कलगीतुरा' साठी राजा बढे यांच्या काही लावण्या त्यांनी गायल्या. एस. चव्हाण त्या चित्रपटाचे दिग्दर्शक होते..आणि त्या सुलोचना चव्हाण झाल्या! यानंतर राजा ठाकूर यांच्या 'रंगल्या रात्री अशा' (१९६२) या अरुण सरनाईक अभिनित चित्रपटातील "नाव गाव कशाला पुसता, अहो मी आहे कोल्हापुरची.." ही त्यांनी गायलेली लावणी हिट झाली. जगदीश खेबूडकरांच्या सिद्धहस्त लेखणीतून आलेल्या नि वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेल्या अशा लावण्यांना त्यांच्या ठसकेबाज गायकीचा बाज लाभला. पुढे यांत "कसं काय पाटील बरं हाय का..?" लावणी फेम 'सवाल माझा ऐका' (१९६५) हा जयश्री गडकर अभिनित होता; तर उषा चव्हाण, गणपत पाटील आदींचा राम कदम यांच्या संगीतातील 'केला इशारा जाता जाता' (१९६५) होता..असे अनंत मानेंचे लावणीप्रधान मराठी चित्रपट गाजू लागले.

"सोळावं वरीस धोक्याचं.." ही सुलोचनाबाईंची लोकप्रिय लावणी
'सवाल माझा ऐका' (१९६४) चित्रपटात सादर करताना जयश्री गडकर!
कालांतराने 'लावणीसम्राज्ञी' म्हणून प्रसिद्ध झालेल्या सुलोचनाबाईंची गायकी ही या गायन प्रकारास दर्जा देणारी खानदानी ठरली! "पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा.." अशा लावण्या डोक्यावर पदर घेत आब राखीत त्या सादर करीत. त्यांमध्ये लावण्यांचे मुखडे आपल्या खास लकबीत पेश करण्याची त्यांची पद्धत होती. जसे "तरुणपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाणं नाक्याचं.." म्हणताना पहिले शब्द लांबवीत शेवटच्या शब्दावर जोर देत मग "सोळावं वरीस धोक्याचं" हे सुचकतेने उच्चारणे! तर "फड सांभाळ तुऱ्याला गं आला.." सारखी बोर्डावरची लावणी त्या बसून त्याच खर्ज्यात सादर करीत.. अन "गं" वर काहीसा लटकेपणाने जोर देत मग "तुझ्या उसाला लागंल कोल्हा.." हे काहीशा अनुनासिक लयीत फिरवीत!

त्यांना मिळालेल्या पुरस्कारांनी एक प्रकारे लावणी गायकीसही मान मिळाला! त्यांत १९६५ साली मिळालेला 'मल्हारी मार्तंड' या चित्रपटातील पार्श्वगायनासाठीचा पुरस्कार आणि २०१० मध्ये मिळालेला 'लता मंगेशकर पुरस्कार' असे महाराष्ट्र शासनाचे सन्मान होते! तर अलीकडे 'पद्मश्री' हा बहुमान त्यांना प्राप्त झाला होता!

पुण्यात 'बालगंधर्व रंगमंदिरात' त्यांची झालेली ओझरती भेट आज आठवते!
त्यांस सुमनांजली!!

- मनोज कुलकर्णी

Wednesday 26 October 2022

"त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का?
त्या प्रकाशी तारकांच्या ओतिसी तू तेज का?
त्या नभाच्या नीलरंगी होऊनिया गीत का?
गात वायूच्या स्वरांने सांग तू आहेस का..?"


पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध करून गायलेले हे लोकप्रिय गीत आज मला आठवले ते हे छायाचित्र पाहून..ज्यात त्यांच्या ज्येष्ठ भगिनी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर जी त्यांना ओवाळत आहेत!
आज हृदयनाथजींचा ८५ वा वाढदिवस आणि आज भाऊबीज ही आहे!
पण आज लतादीदी नाहीत..तेंव्हा हे त्यांच्या मनात असेल असे वाटले!!
 

त्यांस वंदन!!!
- मनोज कुलकर्णी

Sunday 16 October 2022

राजदत्त..मराठी चित्रपटसृष्टीचे ऋषीतूल्य व्यक्तिमत्व!


आपल्या मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज राजदत्त जी यांनी आता वयाची नव्वदी पूर्ण केली आहे. सुमारे साठ वर्षांच्या कारकिर्दीत विविध शैलीचे मराठी चित्रपट अत्यंत संवेदनशीलतेने हाताळलेले ते आता या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे आहेत!

विदर्भात अमरावती जिल्ह्यात जन्मलेल्या त्यांचे मूळ नाव दत्तात्रय मायाळू! शालेय-महाविद्यालयीन काळांत त्यांनी कुसुमाग्रजांचे 'दूरचे दिवे' आणि आचार्य अत्रे यांचे 'उद्याचा संसार' यांसारख्या नाटकांतून भूमिका केल्या होत्या. ते काम प्रख्यात चित्रपटकर्ते राजा परांजपे यांच्या हस्ते पारितोषिक मिळून वाखाणले गेले. पुढे राजाभाऊंचे सहाय्यक होऊन त्यांनी चित्रपट क्षेत्रांत प्रवेश केला!

राजदत्त दिग्दर्शित पहिल्या 'मधुचंद्र' (१९६७) चित्रपटात डॉ. काशिनाथ घाणेकर व उमा!
समाजसेवा व स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा हिरीरीने सहभाग असे. गोवा मुक्ती संग्रामात ही ते उतरले! लेखक ग.त्र्य. माडखोलकर यांच्या प्रोत्साहनाने त्यांचे वृत्तपत्रीय लेखन सुरु झाले होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर नागपूर व पुणे इथे काही काळ त्यांनी पत्रकारिता केली. नंतर (त्या काळच्या) मद्रास येथे जाऊन 'चांदोबा' या मासिकाच्या संपादकीय विभागात त्यांनी काम केले. तिथल्या वास्तव्यात त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. १९५९ च्या सुमारास तिथे नामांकित 'एव्हीएम' या चित्रपट निर्मिती संस्थेचा 'बाप बेटे' हा चित्रपट राजा परांजपे दिग्दर्शित करीत होते. तेंव्हा त्यांच्याकडे या मायाळूंना उमेदवारी करायला मिळाली!

तर असा राजाभाऊंमुळे चित्रपट क्षेत्रात प्रवेश झाल्याने, त्या नावातील 'राज' ला स्वतःच्या नावातील 'दत्ता' जोडून त्यांनी "राजदत्त" नाव धारण केले! 'जगाच्या पाठीवर', 'आधी कळस मग पाया', 'हा माझा मार्ग एकला', 'पडछाया' अशा जवळपास १३ गाजलेल्या मराठी चित्रपटांसाठी राजाभाऊंचे ते सहाय्यक होते. १९६७ च्या सुमारास 'मधुचंद्र' या चित्रपटाद्वारे राजदत्त यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शन करण्यास सुरुवात केली. प्रा. प्रभाकर ताम्हाणे यांच्या मूळ हलक्याफुलक्या प्रेमकथेवरील हा मधुसूदन कालेलकर यांनी पटकथा लिहिलेला चित्रपट लाईट-रोमँटिक शैलीत त्यांनी हाताळला. साधारण हिंदी शहरी बाजाच्या या चित्रपटासाठी त्यांनी एन. दत्ता यांच्या कडून संगीत करून घेतले आणि आशा भोसलें बरोबर महेंद्र कपूर यांचा आवाज वापरला! शीर्षकगीतासह (जे माझे एक आवडते आहे ते) "सुरावटीवर तुझ्या उमटती.." अशी यातील भावरम्य गाणी गदिमांनी लिहिली होती. सुंदर मोहक उमा व डॉ. काशिनाथ घाणेकर ह्या कलाकारांनी यांतील प्रेमी युगुल पडद्यावर तितक्याच तरलतेने साकारले! हा गाजलेला चित्रपट त्या काळचा रोमँटिक-कॉमेडी अन आजच्या भाषेत "रॉमकॉम"!

'घरची राणी' (१९६८) चित्रपटात सहकलाकारासह अनुपमा व सुलोचना!
यानंतरचा दुसरा चित्रपट करण्यास त्यांना चित्रमहर्षी भालजी पेंढारकर व स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर ह्यांचे सहकार्य लाभले. कोल्हापूरच्या 'जयप्रभा स्टुडिओ'त भालजींच्याच कथेवर 'घरची राणी' (१९६८) हा स्त्रीप्रधान चित्रपट त्यांनी केला, ज्याची नायिका होती..लोभस सौन्दर्यवती अनुपमा! यांतील "संसार हा सुखाचा मी अमृतात न्हाते.." हे दत्ता डावजेकर यांच्या संगीतातील जगदीश खेबुडकर यांचे लताजींनी गायलेले गीत संस्मरणीय ठरले. महाराष्ट्र शासनाचा 'सर्वोत्कृष्ट चित्रपटा'चा पुरस्कार यास मिळाला! त्यानंतर असे वेगवेगळ्या धर्तीचे चित्रपट राजदत्तजी यशस्वीरित्या दिग्दशित करीत गेले, जे वेगवेळ्या गोष्टींनी वैशिष्ठ्य पूर्ण ठरले! ह्यांमध्ये रमेश देव व सीमा ह्यांच्या अनोख्या भूमिका असलेला 'अपराध' (१९६९) होता, लेखक ग. दि. माडगुळकर, शंकर पाटील, व्यंकटेश माडगुळकर, द. मा. मिरासदार व चित्रकर्ते राजा परांजपे ह्यांच्या खुमासदार भूमिका असलेला उपहासात्मक 'वऱ्हाडी आणि वाजंत्री' (१९७३) होता, सचिन व नवोदित वंदना पंडित यांच्यासह शास्त्रीय गायक वसंतराव देशपांडे यांची हृदय भूमिका असलेला श्रद्धेवर आधारित 'अष्टविनायक' (१९७९) होता, तर स्त्री शक्तीचं उदात्तीकरण करणारा (माझी एक आवडती अभिनेत्री) रंजना च्या समर्थ अभिनयाचे दर्शन घडविणारा 'अरे संसार संसार' (१९८१) होता!

 
त्यांतही सामाजिक विषयांवर प्रकाशझोत टाकणारे राजदत्तजींचे चित्रपट हे प्रभावी ठरले. ह्यांत समाजसुधारक संत गाडगेबाबांच्या जीवनावरील गोनीदां लिखित नि डॉ. श्रीराम लागू यांच्या अप्रतिम भूमिकेने नटलेला 'देवकी नंदन गोपाला' (१९७७) होता, वेठबिगाराचं जिणं दर्शवणारा यशवंत दत्त अभिनित वास्तववादी 'शापित' (१९८२) होता, तर जयवंत दळवी यांच्या 'पर्याय' नाटकावर आधारित स्त्रीमुक्ती विषयक 'पुढचं पाऊल' (१९८६) होता आणि पुण्यातील थरारक घटनांवर आधारित बहुचर्चित 'माफीचा साक्षीदार' (१९८६) ही होता! त्यांनी 'दूरी' (१९८९) हा हिंदी चित्रपट ही दिग्दर्शित केला होता आणि त्यांत शर्मिला टागोर व मार्क जुबेर यांच्या बरोबर यशवंत दत्त यांनी भूमिका रंगवली होती!

'शापित' (१९८२) चित्रपटात यशवंत दत्त, मधु कांबीकर, कुलदीप पवार व निळू फुले!
राजदत्तजींनी काही लघुपट व माहितीपट पण केले आणि दूरदर्शन मालिका सुद्धा दिग्दर्शित केल्या. यांत 'गोट्या' मालिका गाजली आणि तिने 'रापा' पुरस्कार मिळवला! त्याचबरोबर 'एक कहानी' ही हिंदी मालिका त्यांनी दिग्दर्शित केली आणि सामाजिक प्रश्नांसंबंधी 'इन सर्च ऑफ सोल्यूशन' ही!

सुमारे २८ चित्रपटांचे दिग्दर्शन राजदत्तजींनी केले आणि त्यांतील १४ चित्रपट राज्य पुरस्कारांनी गौरविले गेले!..असे ते एकमेव दिग्गज मराठी चित्रकर्ते! त्याचबरोबर त्यांचे ३ चित्रपट राष्ट्रीय स्तरावर गौरविले गेले. तसेच ताश्कंद, व्हेनिस यांसारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत त्यांचे चित्रपट समाविष्ट झाले!

महाराष्ट्र राज्याचा 'जीवन गौरव', 'चित्रभूषण', दूरदर्शन सह्यांद्रीचा 'चित्ररत्न' अशा पुरस्कारांनी राजदत्तजी सन्मानित झाले! मोठी चित्रपट कारकीर्द नि उच्च स्थानी पोहोचूनही ते विनम्र असतात. मितभाषी, मृदु बोलणारे ते चित्रपट वर्तुळांत आदराचे स्थान मिळवून आहेत. आडनावाप्रमाणेच 'मायाळू' व्यक्तिमत्व!

अशा आदरणीय दत्ताजींना मानाचा मुजरा!..आणि चांगल्या आरोग्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!

- मनोज कुलकर्णी

Sunday 9 October 2022

कोजागरी पौर्णिमा तशीही होती!

पूर्वी पुण्यात सारसबागे मध्ये कोजागरी पौर्णिमा साजरी करण्याचा हौशी पुणेकर मंडळींचा शिरस्ता असायचा!
म्हणजे जेंव्हा टीव्ही चॅनेल्सचं करमणुकीचं जाळं नव्हतं आणि कॉम्प्युटर व मोबाईल ह्या गोष्टींशी केंद्रित भावविश्व नव्हतं; तर निसर्गसान्निध्यात, बागेत फिरायला जाणे ह्या गोष्टी ही मन प्रफुल्लित करायच्या तो काळ!

तेंव्हा मग बऱ्याच जणांची कोजागरी पौर्णिमेची रम्य संध्याकाळ कुटुंब आणि मित्रपरिवार सह सारसबागेत फुलत असे!

"शुक्रतारा, मंद वारा,
चांदणे पाण्यातुनी..
चंद्र आहे, स्वप्नं वाहे,
धुंद या गाण्यातूनी.."

अशा मंगेश पाडगावकरांच्या काव्याच्या ओळी रसिक मना मनांत रुंजी घालायच्या!

गाण्याच्या भेंड्या व्हायच्या. चंद्राकडे पाहत नाजूक भावना फ़ुलायच्या. भेळ, मसाला दुधाचा आस्वाद घेतला जायचा!

आता हे हळुवार भावविश्व राहिले नाही. आधुनिक समृद्धीच्या काळात ही कोजागरी पौर्णिमा आता करमणुकीच्या अत्याधुनिक साधनांसह मंदधुंद वातावरणात पार पडते!

तरीही अशा चांदण्या रात्री, माझ्यासारखा एखादा बंगल्याच्या टेरेसवर एकांतात चंद्राकडे पाहत असे आपले कवीमन फुलवत असतो..
"मसाला दूध घेत पाहता नभातील चंद्राकडे
मनात मात्र असते लोभस मुख प्रियतमेचे!"


- मनोज कुलकर्णी ('मानस रूमानी')

Friday 7 October 2022

'सहेला रे' च्या निमित्ताने..'सहेली रे' चा विचार!

नुकताच पाहण्यात आलेला 'सहेला रे' नामक मराठी चित्रपट. व्यवसायात व्यस्त पती मुळे काहीसा मानसिक कोंडमारा झालेल्या स्त्री ला रियुनियन च्या निमित्ताने जिंदादिल वर्गमित्र भेटतो, त्याचे अव्यक्त प्रेम उमजते आणि ती तिचं प्रफुल्लित जिणं मनसोक्त अनुभवतें, तसेच स्वत्व साध्य करते. असे ह्याचे हे कथासूत्र! (यावरील माझे परीक्षण माझ्या या 'चित्रसृष्टी' ब्लॉग वर इथे प्रसिद्ध झालेय!)

या निमित्ताने सर्वसाधारणपणे दुसऱ्या बाजूने ही विचार केला. समाजात अशीही स्थिती असू शकते की (घराकडे पाठ फिरवून) कला आदी करिअर क्षेत्रांत अतिव्यस्त झालेल्या अति महत्वाकांक्षी पत्नी मुळे संवेदनशील कलासक्त पुरुषाचा मानसिक कोंडमारा झालेला असेल. तेंव्हा त्यालाही हळुवार कवी मनाची शाळा-महाविद्यालयीन लोभस मैत्रीण पुन्हा भेटली, तर तिच्यामुळे त्याचे ही जीवन फुलून येईल! मग तिला ही उद्देशून 'सहेली रे' चित्रपट बनू शकतो!

हे व्यक्त होताना, मी पुरुषप्रधान संस्कृतीचा पुरस्कर्ता नसून, स्त्री-पुरुष समानतेच्या आधुनिक विचारांचा असल्याचे आवर्जून नमूद करतो. समाजात ह्या दोन्ही वर्गांस मोकळेपणाने वावरण्याचे स्वातंत्र्य असल्याने, इथे 'सहेला रे' हवा तर 'सहेली रे' ही हवी असे वाटू शकते!

- मनोज कुलकर्णी

Tuesday 4 October 2022

'सहेला रे'..स्त्रीची स्वत्वासाठी चित्रपटीय हाक!

"सहेला रे.." हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एक अग्रणी किशोरी आमोणकर यांनी राग भोपालीत गायलेले गीत कानात रुंजी घालू लागते! तसेच मृणाल पांडे लिखित संगीतविषयक हिंदी साहित्यकृती 'सहेला रे' ही स्मरते! निमित्त, आता मृणाल कुलकर्णी यांच्या मराठी चित्रपटाचे शीर्षक..'सहेला रे'!

व्यवसायात व्यस्त पती मुळे काहीसा मानसिक कोंडमारा झालेल्या स्त्री ला रियुनियन (माजी - विद्यार्थ्यांच्या मेळाव्या) च्या निमित्ताने अचानक जिंदादिल वर्गमित्र भेटतो, त्याचे अव्यक्त प्रेम उमजते आणि अल्प काळासाठी का होईना ती तिचं प्रफुल्लित जिणं मनसोक्त अनुभवतें, त्याचबरोबर स्वत्व साध्य करते! हे कथासूत्र असणाऱ्या ह्या चित्रपटात सुबोध भावे व सुमित राघवन यांनी अनुक्रमे पती व मित्र ह्या दोन भिन्न प्रकृतीच्या व्यक्तिरेखा त्याच आविर्भावात रंगवल्यात आणि त्यांच्यासमवेत मृणाल कुलकर्णी यांनीच हे स्त्री जीवननाट्य पडद्यावर कधी संयत तर कधी अत्युत्कटतेनं रंगवलंय!

छायाचित्रण उल्लेखनीय आहे. त्यांत काही तीव्र भावनिक प्रसंगांचे चित्रीकरण व त्यातील सेटिंग-लाइटिंग हे हाँगकाँग चे चित्रकर्ते वॊन्ग कर-वाई 
('इन दी मूड फॉर लव्ह'/२००० फेम) यांच्या धाटणीचे वाटते! संबंधित तंत्रज्ञांवर त्यांचा प्रभाव असावा! यातले "सई बाई गं.." गीत चित्रपटाचा आशय घेऊन येते!

या विषयावर वेगवेगळ्या स्वरूपात आधी काही चित्रपट येऊन गेलेत. २०१८ मधील रियुनियन वरचा तामिळ 'नाईन्टी सिक्स' हा या संदर्भात कुणाला आठवला तर नवल नाही! अर्थात 'सहेला रे' हा काही भावनिक नि हलक्याफुलक्या रीतीने संतुलित पटकथेद्वारे चौकटीत हा विषय मांडतो! मात्र काही प्रसंग रचना विनोदासाठी केलेली वाटते. कार्यक्रमातील काव्यवाचन वा किल्ल्यावरच्या मस्तीत मुलांची शेरो-शायरी! इथे अभिरुची राखता आली असती! काही आरोळीवजा (खटकणारे) संवाद सोडता, करमणुकीच्या परिघातच हे चित्रपटीय भाष्य होते!

या क्षणी मला टागोरांच्या अभिजात बंगाली कादंबरी वरील श्रेष्ठ चित्रकर्ते सत्यजित राय यांची 'चारुलता' (१९६४) ही चित्रकृती आठवते. पतीच्या व्यस्ततेमुळे एकाकी जीवन कंठणाऱ्या कला-काव्य रसिक घरंदाज स्त्रीचे जीवन कलासक्त तरुणाच्या येण्याने बदलते असा याचा कथा आशय. अर्थात या कथेस अन्यही कंगोरे होते!

असो, 'प्लॅनेट मराठी' ची 'सहेला रे' ही चित्रपट निर्मिती स्त्रीची स्वत्वासाठी एक हाक म्हणता येईल! मात्र मधेमधे येणारा अनाठायी ह्यूमर (काहीसा खट्याळ) टाळला असता व प्रमुख व्यक्तिरेखांचे भावविश्व अधिक उत्कट (रोमँटिक) करण्या वर भर दिला असता, तर हे तरल भावोत्कट चित्रकाव्य होऊ शकले असते!!


- मनोज कुलकर्णी

Thursday 11 August 2022

'ऊन पाऊस'..एक जीवन वास्तव!

सकाळी खिडकीबाहेर पाहता बऱ्याच काळानं अनोखं दृश्य दिसलं..ऊन अन पाऊस पण! आणि आठवला राजा परांजपे यांचा 'ऊन पाऊस' (१९५४) हा संवेदनशील कौटुंबिक चित्रपट!

उतारवयात मुलांकडे (जणू वाटणी होऊन) एकमेकांपासून दूर राहणाऱ्या माता-पित्याचं जिणं हा याचा केंद्रबिंदू! कथा-पटकथा-संवाद हे ग. दि. - माडगूळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून आले होते. तर, प्रथितयश दिग्दर्शक राजा - परांजपे आणि सुमती गुप्ते यांनी वृद्ध जोडप्याची ही वेदना अत्यंत भावनिकरित्या आपल्या स्वाभाविक (बापूमास्तर व काशीबाई) व्यक्तिरेखांतून पडद्यावर व्यक्त केली होती! स्मृतीपटलावर कायम राहिलेला यातील प्रसंग म्हणजे फोनवरचे ह्या दोघांचे (भावनातिरेकाने अपूर्ण राहिलेले) हृदयाचा ठाव घेणारे संभाषण! छायाचित्रकार बाळ बापट व संकलक बाळ - कोरडे ह्यांनी पण हे दृश्यानुसंधान अधिक परिणामकारक साधले होते! "या कातरवेळी पाहिजेस तू जवळी.." सारखी यातील गदिमा-सुधीर फडकेंची गाणी पण अविस्मरणीय!

'बी. आर. फिल्म्स' चा रवि चोप्रा दिग्दर्शित 'बागबान' (२००३) हा हिंदी चित्रपट 'ऊन पाऊस' वरच आधारित होता आणि अमिताभ बच्चन व हेमा मालिनी ह्यांनी आपल्या परीने ते जोडपे पडद्यावर रंगवले! पुढे 'ए बंधना' (२००७) हा कन्नड चित्रपट ही त्यावर निघाला आणि विष्णुवर्धन व जयाप्रदा ह्यांनी त्या भूमिका रंगवल्या!


आपल्या पडद्यावर आलेले जीवनाचे असे वास्तव कायम लक्षात राहणारे नि सतर्क करणारे!!

- मनोज कुलकर्णी

Wednesday 29 June 2022

 घड्याळाचे काटे कधी कसे फिरतील सांगता येणार नाही!

काय झाक राजकारण चाललंया
कमळ झुलवतंया, ते पळतंया
समदं कसं ओके मदी!

 "नाथ हा माझा.." हे बहुदा कमलनयनी आळवले गेले!

"मजामा छे!", "भाले आसू आमी!"
इथले सत्ताखेळी फिरती परप्रांती!
केसरिया पाहुणचार झोडती..!

Thursday 23 June 2022


ख्यातकीर्त मराठी नाट्य-चित्रपट दिग्दर्शक डॉ. - जब्बार पटेल यांना ८०व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

(एके काळी..नामांकित 'पिफ्फ' मध्ये मी त्यांचा सत्कार करतानाचे हे छायाचित्र!)

- मनोज कुलकर्णी


ख्यातकीर्त मराठी नाट्य-चित्रपट दिग्दर्शक डॉ. - जब्बार पटेल यांना ८०व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

(पूर्वी, माझ्या 'चित्रसृष्टी' प्रकाशन समारंभात मी त्यांचा सत्कार करतानाचे हे छायाचित्र!)

- मनोज कुलकर्णी

Sunday 24 April 2022

अन्यत्र न जाता राज्यकर्ते जनता जनार्दनांत जाऊन निष्ठावान आजींचा आशीर्वाद घेतात ही योग्य वेळी योग्य मुत्सद्देगिरी!


- मनोज कुलकर्णी

आता जातीयवादी नि चारित्र्यहीन राजकारण्यांचे फड ही गाजू लागलेत!

खुळ्यांचं राजकारण अन जनतेला ताप!

Tuesday 5 April 2022

'काँग्रेस' च्या आमदार प्रणिती जी शिंदे यांचे सर्व धर्म समभाव नि वसुधैव कुटुंबकम यावर जोर देणारे व सध्याच्या सर्व मुद्यांचा परामर्श घेणारे कोल्हापुरातील भाषण उत्तम!

त्या येणाऱ्या काळात महाराष्ट्राचे प्रभावी नेतृत्व करू शकतील!

- मनोज कुलकर्णी

Saturday 2 April 2022

नव वर्ष नि विचार!!


"चैत्रातील हा नव वर्षारंभ
घेऊन येवो नव चैतन्य..!
'वसुधैव कुटुंबकम्' विचारानं
सर्व मानवजातीच्या प्रगतीचं!
धर्म-जात सर्व भेद विसरून..
प्रेम, स्नेह भाव रुजवण्याचं!"

- मनोज 'मानस रूमानी'

गुढीपाडवा शुभेच्छा!~रमजान मुबारक!

- मनोज कुलकर्णी

Friday 4 March 2022

जागतिक काय, आपल्या देशांतर्गत एकूणच प्रश्नांची काही कलाकारांना कितपत जाण आहे आणि वर्तमान स्थितीवर ते किती/कसे व्यक्त होतात?  


- मनोज कुलकर्णी

'कलाकार आणि सामाजिक बांधिलकी' परिसंवाद पूर्वी झाला होता. आता किती कलाकारांना ती आहे आणि जागतिक सद्यस्थिती वर ते व्यक्त होतायत?

 

- मनोज कुलकर्णी

Sunday 27 February 2022

कुसुमाग्रज आणि स्वरसम्राज्ञी!

आज 'ज्ञानपीठ' नि ''पद्मभूषण' सन्मानित ख्यातनाम मराठी साहित्यिक, कवी व नाटककार..
वि. वा. शिरवाडकर तथा 'कुसुमाग्रज' यांची ११० वी जयंती!

'प्रवासी पक्षी' आणि 'विशाखा' सारखे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. तर 'नटसम्राट' ही त्यांची कालातीत लोकप्रिय नाट्यकृती ठरलीये!

'मराठी माती' व 'मराठीचिए नगरी' लिहिणाऱ्या त्यांचा हा जन्मदिन 'जागतिक मराठी दिन' म्हणुन साजरा केला जातो.

"काळोखातुनि विजयाचा ये पहाटचा तारा.." सारख्या कुसुमाग्रजांच्या काव्यरचना गायलेल्या 'स्वरसम्राज्ञी' लता मंगेशकर यांच्यासमवेत त्यांचे आज इथे स्मरण!

त्यांस विनम्र सुमनांजली!!

- मनोज कुलकर्णी

Friday 25 February 2022

जगात सध्या काय चाललेय याकडे दुर्लक्ष करीत, काही अजून इतिहास अन पुराण उगाळत बसलेत!

- मनोज कुलकर्णी

Thursday 24 February 2022

विदेशी चित्रपटांच्या धर्तीवर, परदेशांत चित्रण करून मराठी सिनेमा काय साधणार? ओरिजिनल स्टोरी कन्सेप्ट, फिल्ममेकिंग जॉनर असणे आवश्यक!

- मनोज कुलकर्णी

तुम्ही काय दिवे लावले याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही!
आम्ही कशाला वाचायचं/पाहायचं?

राजकीय रंगसंगती कधी कशी ही होईल..
लाल हिरव्यात, निळा केशरीत ही जाईल!

- मनोज 'मानस रूमानी'

Sunday 20 February 2022

समाजात दुफळी निर्माण करणारे चित्रपट का निघतात?
सामाजिक सौहार्द टिकवण्याची आता खरी गरज आहे.
इतिहासावर पडदा टाकून चांगल्या वर्तमानाचा विचार व्हायला हवा!

- मनोज कुलकर्णी

Saturday 19 February 2022

समकालीन समाज वास्तवाचं भान मराठी चित्रपटाला आहे का?
ऐतिहासिक नाहीतर आधुनिकतेचा आव आणलेले 'ऑफ बीटस'
चित्रपट सर्वसामान्यांना कसे अपील होणार?

- मनोज कुलकर्णी

मराठी चित्रपट इतिहासाच्या खिंडीत अडकलाय का?,
अतर्क्यतेच्या आहारी गेलाय का?
काही पडलेले प्रश्न!!


- मनोज कुलकर्णी

शाळेत असताना 'भूगोल' विषय माझा आवडता होता. पृथ्वीतलावरील सृष्टीचे, विविध प्रदेशांचे सर्वंकष ज्ञान त्यात मिळे!
'इतिहास' अजूनही शंका निरसन झालेला विषय वाटत नाही!

- मनोज कुलकर्णी

Wednesday 9 February 2022

लतिका चे झाले लता!

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे मूळ पाळण्यातले नाव हृदया..त्याचबरोबर हेमा ही असल्याचे संदर्भ  आहेत!

त्यांनी वयाच्या पाचव्या वर्षी रंगभूमीवर पाऊल ठेवले ते..वडील पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या संगीत नाटकांतून. पुढे 'भावबंधन' मधील त्यांची "लतिका" ही भूमिका सर्वांच्याच पसंतीस उतरली आणि त्यातूनच त्यांचे नाव "लता" झाले!

खरे तर 'हृदया' हेच त्यांचे नाव अधिक समर्पक ठरते..ते जगातील तमाम संगीत रसिकांच्या हृदयावर गानसम्राज्ञी म्हणून त्यांनी संपादलेले सर्वोच्च स्थान पाहता!

त्यांस सुमनांजली!!

- मनोज कुलकर्णी

Sunday 6 February 2022


अखेरचा हा दंडवत.!!!🙏


होतच होते ह्या भूमीवर सरस्वती पूजन..
आता स्वर्गात होईल गानसम्राज्ञी पूजन!

आमचे एक दैवत 'भारतरत्न' लता मंगेशकर जी आपणास नतमस्तक होत साश्रु नयनांनी माझी ही श्रद्धांजली!!
🥀🙏

- मनोज कुलकर्णी

Friday 4 February 2022

दिलखुलास दिग्गज..प्रोफेशनल ऍक्टर!

दिग्गज अभिनेते रमेश देव जी..तरुण तडफदार आणि बुजुर्ग!

"घरी ये, आमच्याकडे सगळे आर्टिस्ट आहेत!"
साधारण ३० वर्षांपूर्वी एका कार्यक्रमानंतर माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणालेले, आपल्या चित्रपटसृष्टीतील एक प्रस्थ रमेश जी देव आता आडनावानुसार स्वगृही परतलेत!

मूळचे राजस्थानचे आणि नंतर कोल्हापूरच्या मातीत वाढल्यामुळे त्यांच्यात रुबाब अन रांगडेपण दोन्ही होते!..सत्तर वर्षांपूर्वी, हंसा वाडकर नायिका असलेल्या 'पाटलाची पोर' हया दिनकर द. पाटलांच्या चित्रपटातील छोट्या भूमिकेद्वारे ते प्रथम पडद्यावर आले. पण ते स्वतःला शिष्य समजत ते प्रख्यात मराठी चित्रपटकर्ते राजा परांजपे यांचे, ज्यांच्या १९५५ मध्ये आलेल्या 'आंधळा मागतो एक डोळा' चित्रपटात ते खऱ्या अर्थाने चमकले!

'अपराध' (१९६९) चित्रपटातील "सांग कधी कळणार तुला.." गाण्यात रमेश देव व सीमा!
राजाभाऊ परांजपेंच्याच चित्रपटांतून काम करताना रमेशजीं ची सीमा जी ह्यांच्याशी गाठ पडली आणि 'सुवासिनी' (१९६१) हा ते नायक
नायिका असलेल्या चित्रपटातील गदिमांचे "हृदयी प्रीत जागते.." हे गीत ह्या उभयतांच्या आयुष्यात ती अनुभूती देऊन गेले. त्यानंतर दिनकर द. पाटलांच्या 'वरदक्षिणा' (१९६१) मध्ये ते विवाहित जोडप्याच्या रूपात दिसले! पुढे राजाभाऊंच्या 'पडछाया' (१९६५) आणि राजदत्तजीं च्या 'अपराध' (१९६९) ह्या काहीशा वेगळ्या चित्रपटांतून ते दोघे आगळ्या भूमिकांतून आले. अनेकविध मराठी-हिंदी चित्रपटांतून बरोबरीने काम करीत, त्यांचीच निर्मिती असलेल्या 'या सुखांनो या' (१९७५) सारखे त्यांचे सांसारिक जीवनही फुलले!

रमेश जी तसे मराठी बरोबरच हिंदी चित्रपट सृष्टीतही प्रवेशले ते १९६२ च्या 'आरती' चित्रपटाद्वारे. ते व शशिकला ह्यांनी मीना कुमारीच्या दिर व भावजयीच्या भूमिका त्यांत केल्या होत्या. पण सुरुवातीच्या काळात ते खलनायकी भूमिकांतच हिंदी सिनेमात दिसले. 'सरस्वती चंद्र' (१९६८) ह्या अभिजात चित्रपटात नूतनचा श्रीमंत बाहेरख्याली नवरा त्यांनी तसाच रंगवला होता! पुढे जितेंद्र, संजीव कुमार, शत्रुघ्न सिन्हा यांच्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका खल प्रवृत्तीच्या राहिल्या. दरम्यान हृषिकेश मुखर्जीं नी 'आनंद' (१९७१) चित्रपटात त्यांना एका प्रतिष्टीत भूमिकेत आणले ते डॉ. कुलकर्णी म्हणून. ह्यात सीमाजी त्यांच्या पत्नी होत्या आणि हे जोडपे मराठीतच बोलले! ह्यात राजेश खन्ना व अमिताभ बच्चन ह्या दोन (माजी-आजी) सुपरस्टार्सच्या मधील ते दुवा होते!

'आनंद' (१९७१) चित्रपटात अमिताभ बच्चन व राजेश खन्ना ह्या सुपरस्टार्स मधील दुवा!
कोल्हापूर, मुंबई येथील मराठी-हिंदी चित्रपटांतून कामे करीत ते दक्षिणे कडील चित्रपट सृष्टीकडे ही वळले होते. त्यांच्यात कमालीचा प्रोफेशनलिज्म होता हे त्यांच्या बोलण्यां तून जाणवे. मद्रास ला (आताचे चेन्नई) वासन यांच्या 'जेमिनी स्टुडिओज' मध्ये ते कसे पोहोचले हे ते कार्यक्रमात आत्मविश्वास पूर्ण इंग्रजीत संभाषणाने सांगत! तेथील एस. एस. बालन यांच्या अमिताभ बच्चन व माला सिन्हा अभिनित 'संजोग' (१९७१) चित्रपटात ही ते डॉक्टर च्या भूमिकेत दिसले. पुढे 'जनम जनम ना साथ' (१९७७) ह्या गुजराथी चित्रपटात ही ते आले. 'प्रचंदा पुतानीगुलु' (१९८१) या कन्नड चित्रपटाच्या 'अनमोल सितारे' ह्या हिंदी आवृत्तीत ही ते व सीमाजी दोघे होते!

पुढे विविध प्रकारच्या हिंदी चित्रपटां तून ते दिसले..रामसेंच्या थरारक 'दहशत' (१९८१) मध्ये इन्स्पेक्टर, देव आनंद च्या 'हम नौजवान' (१९८५) मध्ये प्रिन्सिपॉल, 'कुदरत का कानून' (१९८७) मध्ये जज, 'सोने पे सुहागा' (१९८८) मध्ये वकील आणि शेवटच्या 'घायल वन्स अगेन' (२०१६) या सन्नी देओल अभिनित-दिग्दर्शित चित्रपटात कुलकर्णी आजोबा!

पुत्र अभिनय व अजिंक्य सह सीमा जी रमेश देव जी!
रमेश जी आणि सीमा जी देव ह्यांचे दोन्ही मुलगे पण चित्रपट क्षेत्रांत आले. अजिंक्य त्यांच्याच 'सर्जा' (१९८७) द्वारे अभिनेता म्हणून आणि अभिनय 'दिल्ली बेल्ली' (२०११) ह्या यशस्वी हिंदी चित्रपटाने दिग्दर्शक म्हणून! रमेशजीं ची क्रेज तरुण अभिनेता मुलासमोर ही किती जबरदस्त होती हे एका कार्यक्रमात अनुभवले. ते त्यांच्या शैलीत खर्ज्यात दिलखुलास हसून जेंव्हा बोलायला लागले तेंव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला होता. ह्याने अजिंक्य ही अचंबित झाल्याचे दिसले!

नव्वदीत ही रमेश देव यांची ऊर्जा ही तरुणांस लाजवणारी होती हे दूरदर्शन च्या एका कार्यक्रमात दिसले. त्या वयात ही "सूर तेच छेडीता.." या आपल्या गाजलेल्या गाण्यावर ते उत्स्फूर्त नाचायला लागले होते!

त्यांना जीवन गौरव सन्मान सह अनेक पुरस्कार मिळाले!!

त्यांस ही सुमनांजली!!

- मनोज कुलकर्णी

Saturday 22 January 2022

संगीत रंगभूमीवरची तेजस्वी तारका!

संगीत रंगभुमीशी समर्पित ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री कीर्ति शिलेदार यांचे निधन झाल्याची बातमी ही धक्कादायक!

चार वर्षांपूर्वी '९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य सम्मेलना' च्या अध्यक्षपदी त्या विराजमान झाल्यावर त्यांच्यावर माझ्या ह्या 'चित्रसृष्टी' (मराठी) ब्लॉग वर मी २१ एप्रिल, २०१८ रोजी लिहिलेला लेख पाहणे!

त्यांस भावपूर्ण सुमनांजली!!

- मनोज कुलकर्णी

Friday 21 January 2022

 मराठी चित्रपट सृष्टीचा आधारवड!

 'पुणे गेस्ट हाऊस' चे कै. चारुदत्त सरपोतदार!

मराठी चित्रपट-नाट्य वर्तुळात जिव्हाळ्याने "चारुकाका" संबोधले गेलेले चारुदत्त सरपोतदार यांस जाऊन आता ४ वर्षे होऊन गेली!

'जावई माझा भला' (१९६३) चित्रपटाचे पोस्टर!
त्यांच्या जाण्याने त्या पिढीचा या क्षेत्राशी समर्पित दुवा हरपला! वेगवेगळ्या कारणां निमित्त त्यांच्या झालेल्या भेटी व मराठी चित्रपट इतिहासावरील चर्चा मला आठवल्या!


त्यांचे वडील नानासाहेब सरपोतदार हे भारतीय चित्रपट सृष्टीच्या प्रवर्तकां पैकी एक होते! त्यांची परंपरा बंधु विश्वास तथा बाळासाहेब सरपोतदार आणि गजानन - सरपोतदार यांच्या बरोबरच त्यांनीही काही वर्षे चालवली. 'रंगल्या रात्री अशा' (१९६२) सह 'जावई माझा भला' (१९६३) व 'घर - गंगेच्या काठी' (१९७५) या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली. पुढे त्यांची चित्रपट निर्मिती जरी थांबली तरी मराठी चित्रपट सृष्टीशी असणारा त्यांचा ऋणानुबंध कायम राहिला. 'अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा'च्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. नंतर कलाकारांसाठी ते जणू आधारवड झाले!

'घर गंगेच्या काठी' (१९७५) चित्रपटाचे पोस्टर!
स्पष्ट नि परखड मत व्यक्त करणाऱ्या त्यांच्या बोलण्यात भावनेचा ओलावाही असे! मला आठवतंय बाळासाहेब - सरपोतदार यांच्या (बहुदा) एकसष्टी निमित्त आम्ही काही निवडक सिने - पत्रकारांनी त्यांचा 'पुणे गेस्ट हाऊस' वर अनौपचारीक सत्कार केला होता. त्या वेळी बासुंदी-पुरी चा बेत चारुकाकांनी तिथे ठेवला होता आणि आग्रह करून स्वतः वाढत होते! नंतर त्यांच्या परीवारा तर्फे मराठी चित्रपटांसाठी 'नानासाहेब - सरपोतदार पुरस्कार' सुरु करताना मराठी चित्रपट इतिहासकार बापू वाटवे यांच्यासह तिथे झालेली बैठक आठवते!

कालांतराने २००२ मध्ये माझा 'चित्रसृष्टी' अंक सुरु झाला..तेंव्हा प्रकाशन समारंभास स्नॅक्स-कॉफी ची ऑर्डर 'पुणे गेस्ट हाऊस' कडेच (त्यांनी ठरवल्या प्रमाणे) दिली होती. नंतर याच्या विशेषांकासाठी कोल्हापुर व पुणे चित्रपट सृष्टीवर विशेष लेख करतांना त्यांच्याशी सखोल चर्चा झाली होती! पुढे मग क्वचित अशाच सदिच्छा भेटी होत..त्यांत त्यांचे पुत्र किशोर सरपोतदार यांच्याशीही जिव्हाळ्याने बोलणे होई!

त्यांना सुमनांजली!!

- मनोज कुलकर्णी

Tuesday 11 January 2022

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत काळाच्या पडद्याआड!


"माझा होशील का.."
हे आशा भोसले यांचे मराठी चित्रपटाच्या सुवर्ण काळातील एक अजरामर गीत!
(त्या सदृश शिर्षकाने एक मालिका सध्याच्या युगात ही गाजतेय!)
तर ते गीत 'लाखाची गोष्ट' (१९५२) या चित्रपटात ज्या साध्याभोळ्या नायिकेवर चित्रित झाले होते..त्या म्हणजे रेखा कामत!..त्या गेल्याची बातमी ऐकली आणि हे आठवले!

'लाखाची गोष्ट' (१९५२) चित्रपटात रेखा कामत दिग्दर्शक  राजा परांजपे!
चित्रा (कुसुम सुखटणकर) आणि रेखा (कुमुद सुखटणकर) ह्या जुन्या काळातील मध्यमवर्गीय मराठी चित्रपटातील सोज्वळ सुसंस्कृत नायिका साकारणाऱ्या अभिनेत्री भगिनी! 
प्रख्यात दिग्दर्शक-अभिनेते राजा परांजपे यांच्या चित्रपटांद्वारे त्या पडद्यावर आल्या आणि सर्वसामान्य मराठी तरुणींचे भावविश्व पडद्यावर साकार होऊ लागले!

'लाखाची गोष्ट' हा चित्रा आणि रेखा यांनी एकत्र काम केलेला गाजलेला चित्रपट..त्यात दोन राजा (परांजपे व गोसावी) त्यांचे नायक होते! त्यानंतर त्या चित्रपटाचे पटकथाकार ग. रा. कामत यांच्याशी विवाह होऊन त्या रेखा कामत झाल्या!..त्या चित्रपटास ७० वर्षें होत असताना ही दुःखद बातमी आली!

शालीन सालस नायिका साकारीत व कालांतराने चरित्र भूमिकांतून येत सुमारे सहा दशके रेखा कामत यांचा अभिनय प्रवास निरंतर राहिला!

त्यांस विनम्र सुमनांजली!!

- मनोज कुलकर्णी

Monday 10 January 2022

मराठी चित्रपट नव्वदीत!

'अयोध्येचा राजा' (१९३२) यात निंबाळकर, गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे दिगंबर!

१९३२ साली प्रदर्शित झालेला पहिला मराठी बोलपट 'अयोध्येचा राजा' हा आता आपली ९० वर्षे पूर्ण करीत आहे.

गौरवशाली 'प्रभात फिल्म कंपनी' निर्मित ह्या बोलपटाचे दिग्दर्शन व संकलन व्ही. शांताराम यांनी केले होते..आणि ध्वनिमुद्रणाचे महत्कार्य यशस्वी करून विष्णुपंत दामले यांनी यांत मोलाचे योगदान दिले होते!

'प्रभात' चे विष्णुपंत दामले!
दादासाहेब फाळकेंनी निर्मिलेल्या 'राजा हरिश्चंद्र' (१९१३) ह्या आपल्या पहिल्या भारतीय चित्रपटाचेच कथानक असलेल्या..'अयोध्येचा राजा' बोलपटाची पटकथा एन.व्ही.कुलकर्णी यांनी लिहिली होती. तर शेख फत्तेलाल यांचे यात कलादिग्दर्शन होते आणि छायाचित्रकार केशवराव धायबर यांनी याचे चित्रीकरण केले होते.

रंगभूमीवरील प्रख्यात गायक-अभिनेते गोविंदराव टेंबे यांनी यात हरिश्चंद्राची प्रमुख भूमिका रंगवली होती आणि संगीतही दिले होते. त्यांच्यासमवेत दुर्गा खोटे ह्या तारामतीच्या भूमिकेत पडद्यावर आल्या, तर रोहिताश्व साकारला होता दिगंबर यांनी!..आणि विश्वामित्र झाले होते निंबाळकर!

हा बोलपट त्याच वर्षी हिंदीत सुद्धा 'अयोध्या का राजा' या नावाने बनला गेला आणि त्यांचे संवाद लेखन मुन्शी इस्माईल यांनी केले होते!

मागे काही अतिउत्साहींनी ('राजा हरिश्चंद्र' मूकपटापासून धरत) मराठी चित्रपटाची शंभरी कार्यक्रम/पुस्तक द्वारे साजरी केली होती. त्यांत तथ्य नव्हते. असो!!

तर आता कुठे ९० वर्षांचा होत असलेल्या आपल्या ह्या मराठी बोलपटास ही मानवंदना!!!

- मनोज कुलकर्णी

Sunday 9 January 2022

 

"प्रथम तुज पाहता.."

'मुंबईचा जावई' (१९७०) ह्या चित्रपटातील हे गीत डोळ्यांसमोर तरळले..जेंव्हा याचे गायक रामदास कामत यांचे निधन झाल्याचे वृत्त ऐकले!

 

राजा ठाकूर दिग्दर्शित ह्या चित्रपटात अभिनेते अरुण सरनाईक यांनी ते सादर केले होते. ते स्वतः गात असत त्यामुळे हे गीत त्या स्वाभाविक हावभावांत पडद्यावर आले होते!

पंडित रामदास कामत हे संगीत रंगभूमीवरचे दिग्गज गायक-कलावंत होते आणि त्यांनी सुमारे १८ नाटकांमधून आपल्या भूमिका सुरेल रंगवल्या होत्या.

 
त्यांस सुमनांजली!!

- मनोज कुलकर्णी

Friday 7 January 2022


पुरस्कार विजेते मराठी चित्रपटकर्ते राजेश पिंजाणी अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याचे वृत्त वाचून धक्का बसला!

'बाबू बँड बाजा' (२०१२) या त्यांच्या सामाजिक चित्रपटास कलाकारांसह तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते!

त्यांच्याशी चित्रपटासंदर्भात झालेली चर्चा आठवते!

भावपूर्ण अभिवादन!!

- मनोज कुलकर्णी 

Wednesday 5 January 2022

वात्सल्यमूर्ती सिंधुताई!


अनाथांची ''माय" होऊन व्रतस्थपणे समाजकार्य करणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाच्या वृत्ताने दुःख झाले!

दहा वर्षांपूर्वी 'मी सिंधुताई सपकाळ' या त्यांच्या जीवनावरील चित्रपटाच्या प्रदर्शन प्रसंगी त्यांची झालेली भेट अजूनही आठवते! "बाळा" संबोधून सर्वांशी संवाद साधण्याचे त्यांचे वात्सल्य मला तेंव्हा अनुभवायास आले!

त्यांस माझी विनम्र श्रद्धांजली!!

- मनोज कुलकर्णी

Saturday 1 January 2022

नवं वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!