Sunday 13 May 2018

आज 'मातृदिनी' काही वर्षांपूर्वी  आमच्या भागात पाहिलेला हृदय प्रसंग आठवला...

रस्त्यावर खेळणाऱ्या छोट्या मुलास एका माणसाने विचारले "कोणाचा रे तू?"
त्या माणसास अपेक्षित होते त्याच्या पालकांचे आडनाव!
त्यावर मुलगा भांबावून म्हणाला "मी आईचा!"

जवळून जाणाऱ्या मला ते ऐकून भरून आले!!

मातृदिन शुभेच्छा!!!

- मनोज कुलकर्णी

Tuesday 8 May 2018

मखमली आवाजाचे लोकप्रिय गायक अरुण दाते.

मराठीतील तलत..अरुण दाते!



- मनोज कुलकर्णी



"संधीकाली या अशा.."

मखमली आवाजाचे लोकप्रिय गायक अरुण दाते गेल्यावर दिवसभर चालू असलेल्या माझ्या (संगणकावरील) 'सिनेमा पुराण' लिखाणातून संध्याकाळी जरा विराम घेत, चहा घेऊन बाहेर आलो..तर झाडांतील आल्हाददायक झुळूक सुखावताना त्यांचे "..प्रणयगीत हे असे कानी ऐकू येतसे.." रूमानी करून गेले!

रफींच्या गाण्यातच अधिक रमणारा मी तलतच्या अभिजात (उर्दू-हिंदी) फ़िल्मी ग़ज़लनी कधी हेलावून जात असे! मात्र मराठी भावगीत प्रकार मी फार कमी म्हणजे... पं. हृदयनाथांच्या त्यांनी वा लता मंगेशकरांनी गायलेल्या त्यांच्या रचनांपुरता कधी तरी ऐकायचो!..पण जेंव्हा अरुण दाते यांनी गायलेले "शुक्र तारा मंद वारा.." कानावर पडले, तेंव्हा मराठी भावगीतही "..आज तू डोळ्यांत माझ्या मिसळूनी डोळे पहा.." असे उत्कट रूमानी असू शकते याचा प्रत्यय मला आला..आणि त्यांची गाणी समरसून ऐकू लागलो!
अरुण दाते तन्मयतेने गाताना..!

इंदूर चे असलेल्या अरुण दाते यांच्यावर स्वाभाविकपणे हिंदी भाषेचा प्रभाव होता..आणि त्यांनी गायनास सुरुवातही हिंदी-उर्दू ग़ज़लने केली होती.."कुछ दिन से बेरुख़ी का अजब सिलसिला हैं.." १९५५ मध्ये आकाशवाणीवर गायला सुरवात केल्यानंतर, त्यांना संगीतकार श्रीनिवास खळे यांनी मंगेश पाडगांवकर यांचे "शुक्र तारा.." हे मराठी गीत गाण्याची गळ घातली! तेंव्हा सुरुवातीस सुधा मल्होत्रा यांच्या बरोबर त्यांनी ते गायले (पुढे अनुराधा पौडवालने साथ दिली)..त्याचा लहेजा हा काहीसा हिंदी ग़ज़ल सदृशच होता!..१९६२ च्या सुमारास त्यांची ती ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध झाली!

अरुण दाते यांनी अनुराधा पौडवाल बरोबर सादर केलेला 'शुक्र तारा'!
'आकाश गंगा' (१९९४) तील "येशील येशील राणी.." अशी थोडीच गाणी त्यांनी चित्रपटासाठी गायली..अर्थात मराठी चित्रपटाचा एकूण बाज हा त्यांच्या मृदु आवाजास मानवणारा नव्हता! मात्र तलत मेहमूद ने "यश हे अमृत झाले.." हे त्यास साजेसे गाणे 'पुत्र व्हावा ऐसा' (१९६१) या अभिजात मराठी चित्रपटात अभिनेता विवेक साठी गायले होते..तशी गाणी वा तरल प्रेमगीतेही मूळ मराठी असलेल्या अरुण दातेंना मिळाली असती तर बहार आली असती!

त्यांनी आपल्या स्वतंत्र बैठकीच्या गायन कार्यक्रमांतूनच तशा श्रोतृवर्गास रिज़वले..आणि २०१० पर्यंत 'शुक्र तारा' चे हजारो कार्यक्रम केले! भावगीत गायनातील दिग्गज गजाननराव वाटवे यांच्या नावाचा पहिला पुरस्कार त्यांना मिळाला!

मी शीर्षकात 'मराठीतील तलत' असे त्यांस संबोधले आहे ते वावगे ठरू नये; कारण त्या दोघांचाही स्वर मृदु नि मुलायम होता आणि गायन शैली ही..हृदयास स्पर्श करणारी!

त्यांस माझी सुमनांजली!

- मनोज कुलकर्णी
['चित्रसृष्टी', पुणे]

Thursday 3 May 2018

आद्य चित्रकर्ते भालजी पेंढारकर.

'बाबा' भालजी पेंढारकरांना वंदन!


- मनोज कुलकर्णी



आपल्या भारतीय चित्रपटाच्या आद्य प्रवर्तकांपैकी एक आणि मराठी चित्रपटसृष्टी तील ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे.. 
चित्रकर्ते भालजी पेंढारकर ज्यांस आदराने "बाबा" म्हंटले जाई! त्यांची आज १२१ वी  जयंती!
भालजी पेंढारकरांच्या 'श्यामसुंदर' (१९३२) ची जाहिरात!

'कलापूर' संबोधले जाणाऱ्या कोल्हापूर मध्ये मूकपट काळातच चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेले भालजी पेंढारकर यांनी अभिनयापासून कारकीर्दीस सुरुवात केली..यात १९२४ मध्ये निर्मित 'पृथ्वीवल्लभ' हा महत्वपूर्ण चित्रपट होता! यानंतर लेखन आणि दिग्दर्शनात त्यांनी पाऊल टाकले..यात मुख्यत्वे पौराणिक व ऐतिहासिक चित्रपट करण्याकडे त्यांचा कल होता. यातही 'बाजीराव मस्तानी' (१९२५) सारखी इतिहासातील (आजही भुरळ पडणारी) प्रेमकथा त्यांनी पडद्यावर आणली..आणि त्या स्वातंत्र्यपूर्व काळात 'वंदे मातरम' (१९२७) सारखा देशाभिमानी चित्रपटही तयार केला!
भालजी पेंढारकर निर्मित 'छत्रपती शिवाजी' (१९५२) ह्या चित्रपटात लीलाबाई व चंद्रकांत!

भालजी पेंढारकरांच्या 'साधी माणसं' (१९६५) या सामाजिक चित्रपटात सूर्यकांत आणि जयश्री गडकर!
१९३२ साली भालजी पेंढारकरांनी लिहून दिग्दर्शित केलेला 'श्यामसुंदर' हा त्यांचा पहिला भरगोस यश संपादलेला चित्रपट..यात शाहू मोडक आणि शांता आपटे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यानंतर 'नेताजी पालकर' (१९३९) व 'थोरातांची कमळा' (१९४१) अशा शिवकालातील रोमहर्षक कथांवर ते चित्रपट करू लागले. त्याच सुमारास 'महारथी कर्ण' (१९४४) हा पुराणातील युगपुरुषावरचा चित्रपट त्यांनी निर्माण केला आणि असे चित्रपट ते हिंदीतूनही करू लागले..ज्यांत पृथ्वीराज कपूर यांनी भूमिका केल्या. तर वाल्मिकी' (१९४६) या त्यांच्या चित्रपटाद्वारे नारदाच्या भूमिकेत राज कपूर पडद्यावर आला!

पुढे भालजी पेंढारकरांचा 'छत्रपती शिवाजी' (१९५२) हा चित्रपट आला..यात चंद्रकांत मांढरे यांनी अतिशय रुबाबात महाराजांची भूमिका साकारली, जी तमाम मऱ्हाटी जणांस भावली! नंतर शिवरायांच्या वीरश्री पूर्ण कथा बाबा खास त्याच्या शैलीत पडद्यावर मांडू लागले; अन आदर्श बोधपटांची जणू मालिकाच सुरु झाली..त्यांत मग 'मराठा तितुका मेळवावा' (१९६४) चित्रपटाने कळस गाठला. यातील शेवटचे "स्वराज्य तोरण चढे...मराठी पाऊल पडते पुढे.." हे महाराजांच्या राज्याभिषेकप्रसंगीचे चित्रगीत आजही स्फूर्तिदायी ठरते!
भालजी पेंढारकरांच्या (अनुपमा अभिनीत) 'तांबडी माती' (१९६९) चित्रपटाचे पोस्टर!

याच दरम्यान भालजी पेंढारकरांनी सामाजिक चित्रपटही केले..ज्यांत 'साधी माणसं' (१९६५) हा चित्रपट फार मोलाचा ठरला. भ्रष्ट समाज व्यवस्थेत भरडल्या जाणाऱ्या भाबड्या खेडुतांचे वास्तव त्यांनी यात दर्शवले. यात सूर्यकांत आणि जयश्री गडकर यांनी त्या भूमिका जणू जगल्या! यास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला! त्यानंतर 'तांबडी माती' (१९६९) हा कोल्हापुरातील अस्सल मातीतला चित्रपट करून त्यात दडलेलं हळवं भावविश्व पडद्यावर रंगवले. यात अनुपमा या रूपगुणसंपन्न अभिनेत्रीने लाजवाब काम केले! बाबांनी तसे अनेक अभिनेते (मांढरे बंधुंसारखे), अभिनेत्री (सुलोचनाबाईंसारख्या) व तंत्रज्ञ चित्रपटसृष्टीत पुढे आणले! त्यांच्या पत्नि लीलाबाई सुद्धा चित्रपटात अभिनय व गायन करीत..'सैरंध्री' (१९३३) या पहिल्या भारतीय रंगीत चित्रपटात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका केली होती!
भालजी पेंढारकर यांस गुरु मानणाऱ्या दादा कोंड़केंची भूमिका असलेला बाबांचा 'गनिमी कावा' (१९८१). 


भालजी पेंढारकर यांचा व त्यांच्या चित्रपटांचा महाराष्ट्रात व राष्टीय स्तरावर गौरव होत गेला. त्याच बरोबर त्यांना 'दादासाहेब फाळके पुरस्कार' बहाल करण्यात आला!

भालजी बाबांचे पुत्र प्रभाकर पेंढारकर यांनी त्यांवर केलेला वृत्तपट!
भालजी पेंढारकर यांचे पुत्र प्रभाकर पेंढारकर यांनीही दिग्दर्शन व लेखन क्षेत्रांत नाव कमावले. बाबांच्या निर्मितीतील 'शाब्बास सुनबाई' (१९८९) चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले..ज्यातून अश्विनी भावे पडद्यावर आली! 'फिल्म डिव्हिजन' द्वारे त्यांनी विविध वृत्तपट व माहितीपट तयार केले!

माझ्या 'चित्रसृष्टी' विशेषांकातून त्यांनी अशा विषयांवर लेखन केले आणि माझ्या चित्रपट पत्रकारितेतील समर्पित कार्याबाबत ते कौतुकोद्गार काढीत!


मागे मी 'मराठी चित्रपट महामंडळा'च्या पुरस्कार सोहळ्या निमित्त कोल्हापूरला गेलो असताना आवर्जून 'जयप्रभा स्टुडिओ'त जाऊन आलो आणि भालजी पेंढारकर यांच्या अनेक चित्रपटांच्या निर्मितीच्या पाऊलखुणा न्याहाळून आलो! एक जिव्हाळा आणि आपुलकीचे चित्रपटीय वातावरण तिथे प्रत्ययास आले..आणि हेलावून गेलो!


बाबांस आणि त्यांच्या थोर कार्यास हा कुर्निसात!!


- मनोज कुलकर्णी
 ['चित्रसृष्टी', पुणे]

Wednesday 2 May 2018

शास्त्रीय व नाट्य संगीत यांतील खानदानी 
मराठी व्यक्तिमत्व..वसंतराव देशपांडे!
'खाँसाहेब' वसंतराव देशपांडेंना सलाम!

- मनोज कुलकर्णी

शास्त्रीय-उपशास्त्रीय गायनात माहीर वसंतराव देशपांडे!

हिंदुस्थानी शास्त्रीय व नाट्य संगीत यांतील एक खानदानी मराठी व्यक्तिमत्व म्हणजे वसंतराव देशपांडे! त्यांची आज जयंती!

'अष्टविनायक' (१९७९) चित्रपटातील वसंतराव देशपांडे यांची  
(वंदना पंडितच्या) सहृदय वधुपित्याची भूमिका!


ग्वाल्हेर, किराणा, पतियाळा, भेंडीबाजार अशा विविध संगीत घराण्यांचे संस्कार होऊनही कोणत्याही घराण्याचा शिक्का वसंतराव देशपांडे यांनी लावून घेतला नाही; मात्र पं. दीनानाथ मंगेशकर यांच्या गायकीचा त्यांच्यावर प्रभाव होता! तबला व हार्मोनियम सुद्धा ते उत्तम वाजवीत. शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनात ते माहीर होते. यांत प्रामुख्याने राग मारवा, मारू बिहाग, यमन आणि नाट्यभैरव गायन ही त्यांची खासियत होती!

लहान वयातच त्यांना रुपेरी पदड्यावर यायची संधी मिळाली..श्रेष्ठ चित्रकर्ते भालजी पेंढारकरांनी आपल्या 'कालियामर्दन' (१९३५) चित्रपटात त्यांना श्रीकृष्णाची भूमिका दिली! कालांतराने राम गबाले यांच्या 'दूध भात' (१९५२) चित्रपटातही त्यांनी काम केले..आणि पुढे (सचिन पिता) शरद पिळगावकरांच्या 'अष्टविनायक' (१९७९) मधील त्यांची (वंदना पंडित च्या) सहृदय वधुपित्याची भूमिका हृदयात घर करून गेली! यात "दाटून कंठ येतो.." हे त्यांनी सादर केलेले गाणे पाहताना डोळे पाणावले!

'कट्यार काळजात घुसली' नाटकात शानदार खाँसाहेबांच्या भूमिकेत वसंतराव देशपांडे!

तरीही वसंतराव देशपांडे आजही रसिकांच्या स्मरणात आहेत ते..१९६७ मध्ये त्यांनी पुरुषोत्तम दारव्हेकरांच्या 'कट्यार काळजात घुसली' या नाटकात केलेल्या शानदार खाँसाहेबांच्या भूमिकेने! अल्पावधीत त्या संगीत नाटकाने तेव्हां सुमारे १००० प्रयोग केले होते. यात पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या संगीतात "सुरत पिया की..", "तेजोनिधी.." व "ह्या भवनातील गीत पुराणे.." अशी त्यांनी खर्जात गायलेली गाणी काळजाला भिडली होती!

१९८२ मध्ये वसंतराव देशपांडे यांना 'संगीत नाटक अकादमी' चा पुरस्कार मिळाला!


योगायोग म्हणजे अलिकडे २०१५ मध्ये सुबोध भावे दिग्दर्शित 'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटात त्यांची खाँसाहेबांची गाजलेली भूमिका सचिन पिळगावकरांनी केली..ज्यांच्या घरच्या निर्मितीतील 'अष्टविनायक' चित्रपटात वसंतरावांनी महत्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारली होती!

आता त्यांचा नातू राहुल देशपांडे शास्त्रीय संगीत साधना करीत असून, 'कट्यार काळजात घुसली' मधील त्यांची गाजलेली भूमिका संगीतरंगभूमी वर करीत आहे..खाँसाहेबांची!

त्यांना विनम्र आदरांजली!!


- मनोज कुलकर्णी

['चित्रसृष्टी', पुणे]

Tuesday 1 May 2018

श्री. सतीश रणदिवे

एकसष्ठी निमित्त अभिष्टचिंतन!


- मनोज कुलकर्णी


दिग्दर्शन करताना श्री. सतीश रणदिवे!
प्रसिद्ध मराठी चित्रपटकर्ते, स्नेही व 'अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा' चे श्री. सतीश रणदिवे यांची ही एकसष्ठी!
सतीश रणदिवे दिग्दर्शित 'नीलांबरी' (१९९५) या 
चित्रपटात शीतल गायकवाड व मिलिंद गवळी!


'बहुरूपी' (१९८४) सारखा व्यावसायिक, 'नीलांबरी' (१९९५) सारखा प्रेमपट; तर 'अन्याय' (१९८७) व 'दुसऱ्या जगातली' (२०१२) सारखे सामाजिक अशा त्यांच्या चित्रपटांनी रसिकांची नेहमीच पसंती मिळवलीये!
'दुसऱ्या जगातली' (२०१२) मध्ये वैष्णवी रणदिवे 
आणि ज्येष्ठ चित्रकर्ते श्री. राजदत्त!



'प्रेमकहानी' (२०१६) या राजस्थान मध्ये चित्रित झालेल्या सतीश रणदिवे यांच्या 
मराठी-हिंदी चित्रपटाच्या येथील महोत्सवातील प्रीमियर प्रसंगी 
कलाकार-युनिट व त्यांच्या समवेत मी!




त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा!!

- मनोज कुलकर्णी
['चित्रसृष्टी', पुणे]