Sunday 29 April 2018

विशेष लेख:


सुवर्णमहोत्सवी सौंदर्यवर्षा!

(गोवन ब्यूटीची गोल्डन ज्युबिली!)



- मनोज कुलकर्णी



सुंदर चेहऱ्यातील नीळसर छटा असणाऱ्या पिंगट डोळ्यांत रोमॅंटिक भाव घेऊन ती षोडशा १९८२ मध्ये 'ब्रह्मचारी' नाटकाद्वारे स्वच्छंदी फुलपाखरी भूमिकेत मराठी रंगभूमीवर अवतरली..आणि 'जवाँ दिलां'ची धड़कन बनली.. ती 'गोवन ब्यूटी' म्हणजे वर्षा उसगांवकर! तिने त्या नाटकात तीच किशोरी ललना रंगवली जी १९३८ मध्ये मास्टर विनायक यांच्या 'ब्रह्मचारी' चित्रपटात गोव्याच्याच मिनाक्षी शिरोडकर यांनी 'त्या काळात' बिनधास्त साकारली होती!
'ब्रह्मचारी' नाटकातून प्रशांत दामले बरोबर वर्षा उसगांवकरची प्रेटी एंट्री!
'गंमत जंमत' ने रूपेरी पडद्यावर गोवन ब्यूटी..वर्षा उसगांवकर!

गोव्यात रंगभूमीवर नैपुण्य प्राप्त करीत असताना वर्षा उसगांवकरने औरंगाबाद येथे डॉ. लक्ष्मण देशपांडे यांच्या कड़े नाट्यशास्त्राचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले ते प्रशांत दामले बरोबर 'ब्रह्मचारी' नाटकाने! ह्याच्या तूफान यशानंतर ती थेट मराठी चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर "मी आले.." अशी साद देत आली..१९८७ चा सचिन पिळगावकरचा 'गंमत जम्मत' हा तो चित्रपट! तिने याद्वारे मराठी नायिकेस खऱ्या अर्थाने ग्लॅमर दिले!

त्यानंतर 'रेशीमगाठी' सारख्या तिच्या चित्रपटांची लिहिलेली परीक्षणे नि तिची रसिकांमध्ये वाढती लोकप्रियता हे सर्व मला आठवतंय..यांत मग नितीश भारद्वाज बरोबर 'पसंत आहे मुलगी' (१९८९) सारखे साजेसे चित्रपट करताना त्यांची बहुचर्चित ठरलेली 'केमिस्ट्री' सुद्धा!
नितीश भारद्वाज बरोबर वर्षा उसगांवकरची रोमॅंटिक केमिस्ट्री!

याच काळात दूरदर्शनवर रवि चोप्रा यांच्या 'महाभारत' (१९८८) या भव्य मालिकेत वर्षा उसगावकर उत्तरा म्हणून अवतरली; तर १९९० मध्ये दूरचित्रवाणीच्या पडद्यावर महत्वाच्या भूमिकेत ती आली..'झाँसी की रानी'! पुढे १९९४ ला नीरजा गुलेरी च्या 'चंद्रकांता' मालिकेत तिची नावाला साजेशी व्यक्तिरेखा होती...रूपमती!
बॉलीवुड च्या 'हनिमून' (१९९२) मध्ये वर्षा उसगांवकर व ऋषी कपूर!

१९९० च्या सुमारास वर्षा उसगावकरने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. यांत मिथुन चक्रवर्ती बरोबरील 'शिकारी' नंतर महेश भट्टचा 'साथी' (१९९१) हा खऱ्या अर्थाने तिचा मोठे यश मिळवलेला हिंदी चित्रपट होता..आदित्य पांचोली आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहसीन खान यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटात तिला गाणीही चांगली मिळाली! यानंतर 'हनिमून' (१९९२) चित्रपटात तर ऋषी कपूर ची ती नायिका झाली. त्रिकोणीय प्रेमकथा असणाऱ्या या चित्रपटात आणखी एक मराठी अभिनेत्री तिच्या समोर आली ती म्हणजे..अश्विनी भावे!
'सवत माझी लाडकी' (१९९३) मध्ये नीना कुलकर्णी आणि वर्षा उसगांवकर!

यानंतर मराठी चित्रपटांतून तिला स्मिता तळवलकरच्या 'सवत माझी लाडकी' (१९९३) सारख्या वेगळ्या आणि संजय सूरकरच्या 'यज्ञ' (१९९४) सारख्या आव्हानात्मक भूमिका मिळाल्या..असे चाकोरीबाह्य चित्रपट करीत अभिनयाचे गहिरे रंग ती दर्शवीत गेली. तिला उत्कृष्ट अभिनयाची पारितोषिकेही मिळाली!
सौंदर्यवती वर्षा उसगांवकरची नृत्यमुद्रा!

मग २००० च्या सुमारास..'चौदवी का चाँद' सारख्या अभिजात हिंदी चित्रपटांस संगीत देणारे श्री. रवि यांचे पुत्र अजय शर्मा यांच्याशी वर्षा उसगावकरचा विवाह झाला..याची निमंत्रण पत्रिका मला रविसाहेबांकडून खास आली होती!

यानंतरही हिंदी चित्रपटांतून ती वेगळ्या भूमिका करीत गेली. यांत एन. चंद्रा च्या 'स्टाईल' (२००१) मध्ये ती इन्स्पेक्टर होती; तर केतन मेहताच्या 'मंगल पांडे' (२००५) या आमिर खान ची भूमिका असणाऱ्या चित्रपटात तिने राणी लक्ष्मीबाईंची भूमिका रंगवली! पुढे 'कंगना' (२०१६) या राजस्थानी चित्रपटातही तिने काम केले!

२०१६ च्याच सुमारास 'अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा'च्या कार्यकारिणीत रुपगुणसंपन्न वर्षा उसगावकर निवडून आल्याने त्या कार्यात चैतन्य येईल याबाबत मी लिहिले होते!
वर्षा उसगांवकरने भूमिका रंगवलेला गोव्याचा कोकणी भाषेतील चित्रपट..'जावोंय नंबर वन'!

मूळची गोव्याची नि मातृभाषा कोकणी असणारी वर्षा उसगांवकर त्या प्रादेशिक चित्रपटांतून मात्र दिसली नव्हती! मात्र चांगली गात असल्याने तिचा कोकणी अल्बम 'रूप तुजेम लयता..' प्रसिद्ध झाला होता..(तिचे कोकणी व हिंदी चित्रपट गीते गाणे मी रूबरू अनुभवले होते!)..


आणि आता तिने भूमिका रंगवलेला गोव्याचा कोकणी भाषेतील चित्रपट अखेर आला..'जावोंय नंबर वन'!

नुकताच तिच्या सुंदर जीवनाचा सुवर्णमहोत्सव संपन्न झाला आहे. यामुळेच या लेखाचे प्रयोजन होते!

ही सौंदर्यवर्षा अशीच रसिकांवर बरसत राहो यासाठी हार्दिक शुभेच्छा!!

- मनोज कुलकर्णी
['चित्रसृष्टी', पुणे]
दत्ता धर्माधिकारी यांनी दिग्दर्शित केलेला 'वैशाख वणवा' (१९६४).

आठवणींच्या हिंदोळ्यावर..!


- मनोज कुलकर्णी


उन्हाची प्रचंड झळ पोहोचवणारा वैशाख महिना सुरु झाला..आणि यातही आल्हाददायक वाऱ्याची झुळूक यावी तसे 'वैशाख वणवा' (१९६४) याच नावाच्या अभिजात मराठी चित्रपटातील गाणे आठवले...

"गोमू माहेराला जाते हो नाखवा..  
तिच्या घोवाला कोकण दाखवा..!"
'वैशाख वणवा' (१९६४) तील "गोमू माहेराला जाते.." गाण्याचा प्रसंग!
कविश्रेष्ठ ग. दि. माडगूळकरांनी लिहिलेले हे गीत डी.डी. म्हणजेच दत्ता डावजेकर यांनी सुमधूर संगीतबद्ध केले होते आणि गोव्याच्या खास लहेज्यात पं. जितेंद्र अभिषेकी यांनी गायले होते!
संगीतकार दत्ता डावजेकर.








पन्नास वर्षांपूर्वी संवेदनशील चित्रपटकर्ते दत्ता धर्माधिकारी यांनी दिग्दर्शित केलेल्या ह्या चित्रपटात रमेश देव, जयश्री गडकर आणि जीवनकला यांच्या प्रमुख भूमिका होत्या. नव्या जोडप्याला नावेतून कोकणाकडे घेऊन जाताना नावाडी यात हे गातात!
गायक पं. जितेंद्र अभिषेकी.



हे निरागस प्रेम नि जिव्हाळा याची प्रचिती देते!

 तर हे 'वैशाख वणवा' चित्र मात्र आल्हाददायी!


- मनोज कुलकर्णी
['चित्रसृष्टी', पुणे]

Wednesday 25 April 2018


जन्मशताब्दी मानवंदना लेख:


तेजस्वी कलावंत..शाहू मोडक!


- मनोज कुलकर्णी 


पडद्यावर श्रीकृष्ण म्हणून मान्यता पावलेले..शाहू मोडक!

शाहू मोडक यांनी बालकृष्ण रंगवलेल्या 'श्यामसुंदर' (१९३२) 
या पहिल्या रौप्यमहोत्सवी मराठी चित्रपटाची जाहिरात!

पौराणिक व सामाजिक चित्रपटांतून अविस्मरणीय व्यक्तिरेखा रंगवलेले आणि एक आख्यायिका झालेले कलावंत शाहू मोडक यांची आज जयंती!..त्याचबरोबर जन्मशताब्दी वर्षही!

अहमदनगर इथे मराठी ख्रिश्चन परिवारात जन्मलेले शाहू मोडक यांनी कीर्ति संपादली ती पडद्यावरील श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर म्हणून! १९३२ मध्ये भालजी पेंढारकर यांच्या 'श्यामसुंदर' या पहिल्या रौप्यमहोत्सवी मराठी चित्रपटातून ते सर्वप्रथम बालकृष्ण म्हणून पडद्यावर अवतरले..आणि त्यांची पूज्य प्रतिमा पुढे होत गेली!
'प्रभात' च्या मानदंड 'माणूस' (१९३९) चित्रपटात शाहू मोडक!

यांतही १९३९ मध्ये 'प्रभात फिल्म क.' च्या व्ही शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या 'माणूस' चित्रपटात त्यांनी वारांगनेचा उद्धार करणाऱ्या प्रामाणिक पोलिसाची भूमिका तितकीच वास्तवपूर्ण साकारली! तर १९४० साली 'प्रभात' च्याच विष्णुपंत दामले व फत्तेलाल शेख़ यांनी दिग्दर्शित केलेल्या 'संत ज्ञानेश्वर' मध्ये त्यांनी ती व्यक्तिरेखा अप्रतिम साकारली!
'पहिली मंगळागौर' (१९४२) चित्रपटात शाहू मोडक व स्नेहप्रभा प्रधान!

१९४२ मध्ये गजानन जहागिरदार यांनी दिग्दर्शित केलेल्या 'वसंतसेना' मध्ये ('श्यामची आई' प्रसिद्ध) वनमाला वसंतसेना होत्या आणि शाहू मोडक रुबाबदार चारुदत्त झाले होते! याच वर्षी 'पहिली मंगळागौर' या लता मंगेशकर यांनी (अपवादात्मक) काम केलेल्या चित्रपटात स्नेहप्रभा प्रधान यांच्याबरोबर त्यांची प्रमुख भूमिका होती!

शाहू मोडक यांनी मराठी बरोबर हिंदी मध्येही भूमिका रंगवल्या. यांत १९४३ च्या ए. आर. कारदार यांच्या 'क़ानून' या हिंदी-उर्दू चित्रपटात त्यांनी मेहताब बरोबर नायक म्हणून काम केले! १९४८ चा 'माया बाजार' खूप गाजला! १९६२ मध्ये पुन्हा त्यांचीच भूमिका असणारा 'संत ज्ञानेश्वर' हा हिंदी चित्रपट खूप लोकप्रिय ठरला..मणिभाई देसाई यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटास संगीत दिले होते लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी! यातील लता मंगेशकर यांनी हृद्य गायलेले "ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो.." (या गाण्याशी माझी बालपणीची आठवण निगडित आहे..ती म्हणजे ते ऐकल्याशिवाय मी झोपत नसे!) माझ्या स्मरणात कायम ते राहील!
'संत ज्ञानेश्वर' (१९६२) चित्रपटात शाहू मोडक!
कालांतराने शाहू मोडक चरित्र भूमिका रंगवू लागले. यांत १९७९ मध्ये गुलज़ार यांच्या हेमा मालिनी ने साकारलेल्या 'मीरा' चित्रपटात ते होते. पुढे उमा भेंडे यांच्या 'भालू' (१९८०) या मराठी आणि कमाल अमरोही यांच्या 'रज़िया सुल्तान' (१९८३) या हिंदी-उर्दू चित्रपटात ते येऊन गेले! तर १९८६ मध्ये 'कृष्णा कृष्णा' मध्ये ते शेवटचे पडद्यावर आले ते सांदीपन ऋषि म्हणून आणि १९९३ मध्ये हे जग सोडून गेले!

पडद्यावर पौराणिक चित्रपटांतून भूमिका रंगवलेले शाहू मोडक हे खऱ्या जीवनात मोठे प्रागतिक विचारांचे होते! पूर्वी एका कार्यक्रमात ओझरते भेटलेल्या त्यांचा तेजस्वी चेहरा मला आठवतोय!

त्यांस माझी विनम्र सुमनांजली!!

- मनोज कुलकर्णी
 ['चित्रसृष्टी', पुणे]

Tuesday 24 April 2018

विशेष मानवंदना लेख!


राजाभाऊ परांजपे...मराठी चित्रपटाच्या सुवर्णकाळाचे चित्रकर्ते!


 - मनोज कुलकर्णी 


राजाभाऊ परांजपे..मराठी चित्रपटाच्या सुवर्णकाळातील चित्रकर्ते!


'पेडगावचे शहाणे' (१९५२) मध्ये राजाभाऊ परांजपे!

"झांजीबार झांजीबार झांजीबार.."

वेड्यांच्या इस्पितळात नीयतीच्या क्रूर खेळामुळे वेडे झालेल्यांबरोबर तसेच सोंग घेऊन नाचताना 'पेडगावचे शहाणे'..म्हणजे राजाभाऊ परांजपे यांनी (विक्षिप्त) झोकात सादर केलेले हे गाणे नि त्यांवरील तो (भकास) नाच! १९५२ सालचा हा चित्रपट दूरदर्शन वर पाहताना चर्र झालं होतं!

त्यानंतर बऱ्याच वर्षांनी फिल्म फेस्टिवल मध्ये 'सर्कस पॅलेस्टाईन' (१९९८) ह्या इस्राईलच्या चित्रपटातील एक दृश्य पाहून त्याची आठवण झाली..यांत बरा होऊन बाहेर आलेला तरुण आपली प्रेयसी दुसऱ्याबरोबर पाहून (शहाण्यांच्या जगात पुन्हा वेडे होण्यापेक्षा वेड्यांच्या दुनियेत शहाणे राहू अशा विचाराने) अस्वस्थ होऊन माघारी फिरतो!
'ऊन पाऊस' (१९५४) या श्रेष्ठ करुण चित्रकृतीमध्ये सुमति गुप्ते व राजाभाऊ परांजपे!


जीवनाचे असे अनोखे रंग राजाभाऊ परांजपे यांनी आपल्या अभिजात मराठी चित्रकृतीं मधून दर्शवले. त्यांचा अभिनय नि दिग्दर्शन थेट काळजाला भिड़े!..त्यांचा आज जन्मदिन!

मिरजेला १९१० साली जन्मलेले राजा परांजपे मूकपटांचा काळातच चित्रपटाकडे ओढले गेले..तेंव्हा पडद्यासमोर वाद्ये वाजवणाऱ्यांत ते प्रथम सामील झाले! त्यानंतर नटश्रेष्ठ केशवराव दाते यांनी सुचविल्यामुळे 'नाट्यमन्वंतर' संस्थेत त्यांना ऑर्गन वादकाचे काम मिळाले..आणि मग 'गोदावरी सिनेटोन' मध्ये संगीतकार बापूराव केतकर यांचे ते सहाय्यक झाले!


'हा माझा मार्ग एकला' (१९६३) मध्ये राजाभाऊ परांजपे व बाल सचिन!
त्यानंतर १९३६ साली कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी दिग्दर्शित केलेल्या (आद्य सामाजिक समस्याप्रधान) 'सावकारी पाश' चित्रपटात त्यांना छोटी भूमिका मिळाली. नंतर कोल्हापुरात चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्याकडे ते सहाय्यक दिग्दर्शक म्हणून रुजू झाले! बाबांच्या 'कान्होपात्रा' (१९३७) सारख्या काही चित्रपटांतून त्यांनी विविध भूमिका रंगवल्या!

मग १९४८ मध्ये विष्णुपंत चव्हाण आणि वामनराव कुलकर्णी यांची निर्मिती असलेल्या 'जीवाचा सखा' या चित्रपटाने राजाभाऊ परांजपे यांना दिग्दर्शनाची पहिली संधी मिळाली. इथेच त्यांना भेटले पटकथाकार ग. दि. माडगूळकर व संगीतकार सुधीर फडके..आणि या त्रयीने पुढे मराठी चित्रमाणके घडवली!
बिमल रॉय यांच्या 'बंदिनी' (१९६३) या हिंदी चित्रपटात राजाभाऊ परांजपे, अशोक कुमार व नूतन!

आपल्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत राजाभाऊंनी विविध प्रकारचे चित्रपट हाताळले..यात 'पुढच पाऊल' (१९५०) सारखा प्रागतिक सामाजिक, 'लाखाची गोष्ट' (१९५२) सारखा उपहासगर्भ आणि 'पडछाया' (१९६५) सारखा थरारपटही होता! यांत रमेश देव-सीमा यांची पडद्यावर यशस्वी कारकीर्द सुरु करणारा कौटुंबिक 'सुवासिनी' (१९६१)..आणि बाल सचिन ची चित्रपट कारकीर्द सुरु करणारा 'हा माझा मार्ग एकला' (१९६३) ह्यांसाठी त्यांना 'उत्कृष्ठ दिग्दर्शका'ची पारितोषिके मिळाली!
मधुकर पाठक यांच्या 'संथ वाहते कृष्णामाई' (१९६७) मध्ये राजाभाऊ परांजपे!


राजाभाऊंनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटांतून आपल्या समर्थ अभिनयाचे दर्शन घडवले! यांत त्यांनी स्वतः दिग्दर्शित केलेल्या 'जगाच्या पाठीवर' (१९६०) सारख्या चित्रकृति; तर अन्य..म्हणजे बिमल रॉय सारख्या श्रेष्ठ बंगाली दिग्दर्शकाचा 'बंदिनी' (१९६३) आणि स्वतःचे आधी सहायक असलेले मधुकर तथा बाबा पाठक यांनी स्वतंत्र दिग्दर्शित केलेला 'संथ वाहते कृष्णामाई' (१९६७) यांचा समावेश होतो!

प्रामुख्याने उल्लेख करायचा तो त्यांनी दिग्दर्शित करुन अभिनय केलेल्या 'ऊन पाऊस' (१९५४) या श्रेष्ठ करुण चित्रकृतीचा..मुलांनी वाटून घेऊन ताटातूट केलेल्या वृद्ध जोडप्याची व्यथा त्यांनी सुमति गुप्ते यांसह काळीज पिळवटून टाकणाऱ्या आविर्भावांत यातून व्यक्त केली! यापासून स्फूर्ती घेऊन रवि चोप्रा यांनी 'बाग़बान' (२००३) हा हिंदी चित्रपट बनविला होता..त्यांत अमिताभ बच्चन व हेमा मालिनी यांनी मूळ (राजाभाऊ-सुमतीबाई यांनी हृदयद्रावक साकारलेला) टेलिफोन वर बोलण्याचा प्रसंग ही सादर केला!..तर राजाभाऊंच्या रहस्यप्रधान 'पाठलाग' (१९६४) वरुन राज खोसला यांनी (सुनील दत्त व साधना यांची भूमिका असलेला) 'मेरा साया' (१९६६) हा हिंदी चित्रपट केला होता!
"एक धागा सुखाचा.."..'जगाच्या पाठीवर' (१९६०) 
मध्ये सादर करताना राजाभाऊ परांजपे!


तीन निर्मिंतींसह सुमारे ३२ चित्रपट राजाभाऊ परांजपे यांनी दिग्दर्शित केले आणि १९६९ सालचा 'आधार' यांत शेवटचा होता!..मात्र १९७४ सालच्या 'उस पार' पर्यंत सुमारे ८० चित्रपटांतून ते पडद्यावर अभिनेते म्हणून आले..आणि १९७९ साली हे जग सोडून गेले..माडगूळकरांच्या शब्दांत जीवनाचे सार मांडून..

"एक धागा सुखाचा..शंभर धागे दुःखाचे..
जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे!"

त्यांना माझी विनम्र भावांजली!!

- मनोज कुलकर्णी
 ['चित्रसृष्टी', पुणे]

Monday 23 April 2018

महाराष्ट्राची लाडकी सोनपरी..मृणाल कुलकर्णी!


- मनोज कुलकर्णी


सुंदर मोहक 'सोनपरी'..मृणाल कुलकर्णी!

'महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व'..सौंदर्यवती मृणाल कुलकर्णी सुद्धा!
'महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व' असे लोकप्रिय साहित्यिक पु. ल. देशपांडे यांस संबोधले गेले. माझ्या मते महाराष्ट्राचं असं लाडकं व्यक्तिमत्व अजूनही एक आहे..ती म्हणजे मृणाल कुलकर्णी! महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा 'चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान' पुरस्कार या रूपगुण संपन्न अभिनेत्री व दिग्दर्शिकेस जाहीर झाल्याने तिच्या आजवरच्या दैदीप्यमान कारकीर्दीवर हा दृष्टीक्षेप!
'स्वामी' मालिकेतील रमा..मृणाल देव (कुलकर्णी).

साहित्य व कला यांची पार्श्वभूमी असणाऱ्या (गो. नी. दांडेकर व देव) कुटुंबातील षोडशवयीन सुंदर मृणाल सर्वप्रथम  छोट्या पडद्यावर अवतरली! 'रामशात्री' ने ख्यातिप्राप्त गजानन जहागिरदार यांनी दिग्दर्शित केलेल्या 'स्वामी' ह्या मराठी दूरदर्शन मालिकेत ती थेट पेशवे घराण्याची (माधवरावांची पत्नि) लहानगी सून रमा ह्या भूमिकेतच दिसली! पदार्पणातच घराघरांत पोहोचून हे गोजिरे रूप सर्वांचे आवडते झाले!
'श्रीकांत' (१९८५) या दूरदर्शन मालिकेत फ़ारूक़ शेख़ बरोबर मृणाल देव (कुलकर्णी).

'कमला की मौत' (१९८९) मध्ये मृणाल कुलकर्णी व आशुतोष गोवारीकर!
मग १९८५ मध्ये मृणालने दूरदर्शन वरील 'श्रीकांत' या मालिकेत फ़ारूक़ शेख़ बरोबर वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखा साकारली. विख्यात बंगाली साहित्यिक शरत्चन्द्र चट्टोपाध्याय यांच्या कथेवर ही मालिका होती. आजोबा कै. गोनीदा मराठी साहित्यातील मानाने घेतले जाणारे नाव आणि वडील डॉ. विजय देव नि आई प्रा. वीणा देव अध्यापनाच्या क्षेत्रांत व साहित्याचे जाणकार..त्यामुळे साहजिकच तिचीही साहित्याची जाण उत्तम होती नि व्यासंगही; म्हणूनच अशा अन्य प्रादेशिक भाषेतील अभिजात साहित्यातील भूमिका तिने समजून-उमजून  वठवली!
मृणाल कुलकर्णी..ग्लॅमरस स्वीट लूक!

पुढे 'पुणे विद्यापीठा'तून तिने मराठी भाषेत 'एम्.ए.' सुद्धा केले! दरम्यान 'विको' सारख्या जाहिरातींमधून नववधूच्या जाहिरातीत दिसणारी मृणाल लवकरच अॅड. रुचिर कुलकर्णीं बरोबर विवाहबद्ध झाली. सासरे जयराम कुलकर्णीही अभिनय क्षेत्रात..त्यामुळे या कलाप्रेमी परिवाराकडूनही तिच्या कलागुणांस प्रोत्साहन मिळाले!

गाजलेल्या 'अवंतिका' मालिकेत मृणाल कुलकर्णी.
अल्पावधीतच मृणाल मोठ्या पडद्यावर आली..समांतर चित्रपट ऐन भरात असणाऱ्या त्या काळात १९८९ मध्ये बासु चटर्जी यांच्या 'कमला की मौत' मध्ये तिने वेगळी भूमिका रंगवली. आज दिग्दर्शक म्हणून नाव कमावलेला आशुतोष गोवारीकर या चित्रपटात तिच्या बरोबर होता! पण त्यानंतर ती फारशी मोठ्या पडद्यावर दिसली नाही; कारण अनेक दूरचित्रवाणी मालिकांत ती व्यस्त होत गेली! मात्र मला असे नेहमी वाटते की मुख्य प्रवाहातील 'बॉलीवुड' धरतीच्या चित्रपटांत जर ती वेळेत आली असती, तर सौंदर्य नि गुणवत्ता या जोरावर ती इथे आघाडीची (लीना चंदावरकर सारखी) 'ग्लॅमरस स्टार' झाली असती!

तरी मृणाल ने 'झी' च्या 'हसरतें' पासून 'स्टार' च्या 'सोन परी' पर्यन्त गाजलेल्या हिंदी दूरचित्रवाणी मालिकांतून 'प्रेटी टीव्ही स्टार' म्हणून मोठी लोकप्रियता मिळवली! या दरम्यान तिने 'मीरा', 'नूरजहाँ', 'हब्बा खातुन' ते द्रौपदी, अहिल्याबाई व जीजाबाई पर्यंत महत्वाच्या स्त्री व्यक्तिरेखा लाजवाब साकारल्या! त्याचबरोबर २००१-०३ दरम्यान त्या वेळच्या 'अल्फा मराठी' वरील स्मिता तळवलकर दिग्दर्शित 'अवंतिका' मध्ये तिने साकारलेली शिर्षक व्यक्तिरेखा खूप लोकप्रिय झाली..आणि पुरुषप्रधान संस्कृतीमधील तिच्या प्रागतिक भूमिकेने ती महिला वर्गाची तर प्रचंड लाडकी झाली!
'जोडीदार' (२००० ) चित्रपटातील पारितोषिक विजेत्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी.

दरम्यान मृणालने काही मराठी चित्रपटांतूनही प्रमुख भूमिका साकारल्या..यांत 'माझं सौभाग्य' (१९९४) व 'जमलं हो जमलं' (१९९५) सारखे कौटुंबिक चित्रपट होते; तर 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' (२०००) व 'वीर सावरकर' (२००१) सारख्या चरित्रपर महत्वाच्या चित्रकृती होत्या. 

ग्लॅमरस सौंदर्य व गुणवत्ता..मृणाल कुलकर्णी!
त्याचबरोबर काही हिंदी चित्रपटांतूनही कामे केली..यांत 'आशिक़' (२००१), 'उफ़्फ़ क्या जादू मोहब्बत है' (२००४) व 'कुछ मीठा हो जाये' (२००५) यांचा समावेश होतो! तसेच 'राज-का-रण' (२००५), 'मेड इन चायना' (२००९) व 'यलो' (२०१४) सारख्या राजकीय-सामाजिक मराठी चित्रपटांतूनही तिने लक्षणीय भूमिका केल्या!


अभिनय क्षेत्रात चांगले योगदान दिल्यावर मृणालने दिग्दर्शन करण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला आणि २०१३ मध्ये 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं' ह्या लोकप्रिय कवि मंगेश पाडगावकर यांच्या कवितेने स्फूर्ती घेऊन त्याच शिर्षकाचा रोमँटिक मराठी सिनेमा प्रथम दिग्दर्शित केला आणि त्यात भूमिकाही करून अभिनय आपण सोडलेला नाही याची ग्वाही दिली! याच्या पुढच्याच वर्षी तिने 'रमा-माधव' ही पेशवाईच्या राजकीय-सांस्कृतिक पार्श्वभूमीवरील करुण प्रेमकथा आपल्या लेखन-दिग्दर्शनातून अनोख्या नि भव्यदिव्य स्वरूपात पडद्यावर आणली!..आणि आपल्या रमा या श्रेष्ठ स्त्री व्यक्तिरेखेस एक प्रकारे मानवंदना दिली!

आपल्या प्रदीर्घ अभिनय कारकिर्दीत मृणाल कुलकर्णीस आजवर अनेक पुरस्कार मिळालेत. यांत 'जोडीदार' (२०००) या मराठी चित्रपटातील भूमिकेसाठी 'स्क्रीन' चा 'उत्कृष्ठ अभिनेत्री' आणि तिच्या तिच्या अत्यंत गाजलेल्या गोंडस 'सोनपरी' साठी 'स्टार प्रवाह' चा 'बेस्ट जादुई क़िरदार' ह्यांचा प्रामुख्याने समावेश होतो. तसेच तिने प्रमुख भूमिका केलेल्या अमोल पालेकरांच्या 'थांग' (२००५) ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता!..तर तिने स्वतः दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांस आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली प्रशंसा प्राप्त झालीये!

आता त्यांचा मुलगा विराजसही आईच्या पाऊलावर पाऊल ठेवत या कला क्षेत्रात आला असून, नुकतेच त्याने 'हॉस्टेल डेज' या मराठी चित्रपटाद्वारे रूपेरी पडद्यावर जोरदार पदार्पण केले आहे..तर त्याने लिहिलेल्या पटकथेवर आता मृणाल कुलकर्णीचा नविन दिग्दर्शकीय चित्रपट 'ती अँड ती' येऊ घातला आहे..या सगळ्या बरोबर समाजकार्यांतही तिचा हीरीरिने सहभाग असतो!
दिग्दर्शन क्षेत्रातही यशस्वी पाऊल!..मृणाल कुलकर्णी!

चित्रपट कारकिर्दीसह पुढच्या सर्व कार्यांसाठी आणि या सृजनशील विश्वात कायम सोनपरीच राहण्यासाठी आमच्या फेव्हरेट मृणाल कुलकर्णीस माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!!


- मनोज कुलकर्णी
 ['चित्रसृष्टी', पुणे]

Saturday 21 April 2018

नाट्यसम्मेलनाध्यक्ष पदी संगीत रंगभूमीच्या शिलेदार!



मुंबईत होणाऱ्या '९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य सम्मेलना' च्या अध्यक्षपदी संगीत रंगभुमीशी समर्पित ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री कीर्ति शिलेदार यांची निवड झाली याचा आनंद झाला!


कीर्ति शिलेदार नि 'स्वरसम्राज्ञी' हे समीकरण!
'शारदा', 'शाकुंतल, 'सौभद्र', 'स्वयंवर' अशा अनेक संगीत नाटकांतील त्यांचा बहारदार अभिनय  नि गायकी ही रसिकांना मंत्रमुग्ध करुन गेली आहे. कीर्ति शिलेदार आणि 'स्वरसम्राज्ञी' हे समीकरण मी अनुभवलेय!

तसेच संगीत रंगभूमीचे दिग्गज जयराम शिलेदार व जयमाला शिलेदार यांच्या उपस्थितीत त्यांच्या या प्रसिद्ध कन्येची भूमिका असलेले 'मंदोदरी' हे नाटक पूर्वी पाहून, त्यावर लिहिल्याचे आणि त्यांच्याशी सुसंवाद साधल्याचे मला चांगले स्मरते! 
तेंव्हा मी चित्रपट परीक्षणाबरोबर क्वचित नाट्य परिक्षण ही लिहित असे!

दिल्लीच्या 'संगीत नाटक अकादमी'चा विशेष पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा 'अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार' आणि 'बालगंधर्व' पुरस्कार यांनी त्यांचा गौरव झाला आहे.

त्यांचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा!!

- मनोज कुलकर्णी
 ['चित्रसृष्टी', पुणे]

Thursday 19 April 2018

हार्दिक अभिनंदन!💐


महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा 'चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान' पुरस्कार रूपगुण संपन्न अभिनेत्री व दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांस जाहीर झाला आहे हे ऐकून मला विशेष आनंद झाला!

- मनोज कुलकर्णी
 ('चित्रसृष्टी', पुणे)

Wednesday 11 April 2018

श्रीमती सुमित्रा भावे व सुनिल सुकथनकर बरोबर मी.. 
'एन.एफ.ए.आय.' मध्ये 'कासव' चित्रपट पाहताना!

आम्ही चित्रपट प्रवासी!


 - मनोज कुलकर्णी



१९८३ चा माझा महाविद्यालयीन काळ..चित्रपट विषयक लिखाणास मी सुरुवात केली होती! त्याच सुमारास पुण्यामध्ये 'चित्रदर्शन' या संस्थेचे चित्रपट रसग्रहणाचे कार्यक्रम सुमित्रा भावे आणि त्यांच्या सहकारी करू लागले..आणि मी त्याचा सदस्य झालो! 'टिळक स्मारक मंदिर' च्या बेसमेंट मधे याचे वर्ग होत..अध्यापनासाठी प्रा. श्यामला वनारसे व 'फिल्म इंस्टिट्यूट' चे प्रा. सतीश बहादुर येत..मग सत्यजित राय यांच्या विख्यात 'पाथेर पांचाली' पासून ते तत्कालिन पूर्व यूरोपियन चित्रपटांपर्यंत अनेक चित्रकृतिंवर त्यांतील दृश्ये पाहून अभ्यासपूर्ण चर्चा होई! त्यावेळी माझ्याबरोबर समवयस्क सहभागी होते..अभिराम भडकमकर आणि सुनिल सुकथनकर!
'फिल्म इंस्टिट्यूट' मध्ये मी 'फिल्म अप्रिसिएशन कोर्स' चे सर्टिफिकेट
विख्यात मल्याळी चित्रकर्ते अडूर गोपालकृष्णन यांच्याकडून घेताना! 
(मध्यभागी प्रा सतीश बहादूर!)

नंतर 'कम्युनिकेशन एंड जर्नालिज़्म' च्या पदवी शिक्षणासाठी मी १९८७ मध्ये 'पुणे विद्यापीठा'च्या 'रानडे इंस्टिट्यूट' ला गेलो, अभिराम नाट्यविषयक पदविका अभ्यासक्रमासाठी 'नॅशनल स्कूल ऑफ़ ड्रामा' ला गेला आणि सुनिल चित्रपट दिग्दर्शन अभ्यासक्रमासाठी 'फिल्म इंस्टिट्यूट' ला! याच काळात मी आमच्या 'जर्नालिज़्म डिपार्टमेंट' मधे 'फिल्म क्लब' पाहू लागलो..आणि ग्रिफिथ (अमेरिका-'बर्थ ऑफ़ ए नेशन'), आइसेंस्टिन (सोविएट/रशिया-'बैटलशिप पोटेमकिन'), डी सिका (इटली-'बाइसिकल थीव्ज़'), गोदार्द (फ्रांस-'ब्रेथलेस'), बर्गमन (स्वीडन-'वर्जिन स्प्रिंग'), कुरोसवा (जपान-'राशोमोन') सारख्या जगविख्यात दिग्दर्शकांचे महत्वाचे चित्रपट त्यात दाखवले. दरम्यान सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर यांनी संयुक्त चित्रपट करणे सुरु केले होते. त्यातील 'पाणी' व 'बाई' हे लघुपट घेऊन ते तिथे आले होते!
'दोघी' (१९९६) या चित्रपटात सोनाली कुलकर्णी व रेणुका दफ्तरदार!

'बी. सी.जे.' नंतर १९८९ मध्ये मी 'फिल्म इंस्टिट्यूट' मध्ये सतीश बहादुर व 'नॅशनल फिल्म र्काइव्ह' चे संस्थापक-संचालक पी. के. नायर यांच्या प्रोत्साहनाने 'फिल्म अप्रिसिएशन कोर्स' केला आणि प्रोफेशनल फिल्म क्रिटिक म्हणून बऱ्याच ठिकाणी लिखाण करू लागलो. १९९५ पासून 'आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'स ('इफ्फी') जाऊ लागलो. त्यामुळे जागतिक चित्रपटावरील लिखाणात अद्ययावतता येत राहिली.
'बाधा' (२००६) या चित्रपटात अमृता सुभाष!

मग १९९६ मध्ये दिल्लीत झालेल्या 'इफ्फी' मध्ये आपला 'दोघी' हा चित्रपट घेऊन सुमित्रा भावे आणि सुनिल हे..कलाकार सोनाली कुलकर्णी व रेणुका दफ्तरदार सह आले होते..त्यावेळी वार्तालाप मध्ये मी त्यांचा घेतलेला फोटो अजुन माझ्याकडे आहे..नंतर पुण्यात त्यांच्या मुलाखतीही घेतल्या! दरम्यान अभिराम भडकमकरने अभिनयाबरोबर नाटक व मराठी चित्रपट लिहिणे सुरु केले होते!

मी पण प्रिंट बरोबरच इलेक्ट्रॉनिक मीडियासाठीही लेखन सुरु केले..माझ्या स्क्रिप्ट्स वर 'झी' (हिंदी) व 'सह्याद्री' (मराठी) वर चित्रपट विषयक कार्यक्रम झाले!

इफ्फी' प्रमाणेच 'मामी', 'मिफ्फ', 'एशियन' अशा वेगवेगळे फिल्म फेस्टिवल्सना मी जाऊ लागलो आणि भावे-सुकथनकर यांचे चित्रपटही त्यांत येत गेले..पुरस्कार व राज्य पारितोषिकेही मिळवीत गेले! 'दोघी' ने ज्वलंत वास्तव पडद्यावर आणण्याची त्यांची दिसलेली सामाजिक बांधिलकी पुढेही कायम राहिल्याचा प्रत्यय त्यांच्या चित्रपटांतून येत गेला! 'एड्स' सारख्या समाजाला पोखरणाऱ्या विषयावरही २००० साली त्यांनी 'जिंदगी ज़िंदाबाद' नावाचा हिंदी चित्रपट करून अतिशय संवेदनशील भाष्य केले! मग 'वास्तुपुरुष' (२००२) व 'बाधा' (२००६) या पुन्हा मराठी चित्रपटांतून रूढ़ी, परंपरा नि अंधश्रद्धा यांवर त्यांनी प्रकाश टाकला! दरम्यान अभिराम भडकमकरने 'आम्ही असू लाड़के' चित्रपट करून लेखनाबरोबरच दिग्दर्शनात पाऊल टाकले!
माझ्या 'चित्रसृष्टी' नियतकालिकाच्या प्रकाशन समारंभात (डावीकडून) मी आणि.. 
(सर्वश्री) सतीश बहादूर, पी. के. नायर, राम गबाले, शशीधरन व जब्बार पटेल!


२००२ साली माझे 'चित्रसृष्टी' हे जागतिक चित्रपटावर इतिहास, सद्यस्थिती नि विकास या दृष्टिकोनातून प्रकाशझोत टाकणारे नियतकालिक सुरु झाले..त्यामध्ये चित्रपट महोत्सवांवरील लेखांमधून भावे-सुकथनकर यांच्या चित्रपटांवरही भाष्य असू लागले!

'संहिता' (२०१३) चित्रपटात देविका दफ्तरदार, राजेश्वरी सचदेव व मिलिंद सोमण!


२००६ मध्ये 'नितळ' चित्रपटातून कोड हा व्यक्तिमत्वावर डाग नसल्याचे भावे-सुकथनकर यांनी मानवतावादाच्या दृष्टिकोनातून मांडले..देविका दफ्तरदारने ही व्यक्तिरेखा समंजसपणे सुरेख साकारली होती. दरम्यान मुलांसंदर्भातील शिक्षणाच्या दृष्टिकोनावर भाष्य करणारा 'दहावी फ' ही त्यांनी पास केला! पुढे 'एक कप च्या' (२००९) मधून भ्रष्ट व्यवस्थेवर प्रकाश टाकला! याच सुमारास त्यांनी 'घो मला असला हवा' हा कोकणी भाषेचा लहेजा असलेला लोकप्रिय जॉनरचा, पण उपहासगर्भ चित्रपट निर्माण केला..यात राधिका आपटेने भन्नाट भूमिका रंगवली..महोत्सवातही प्रेक्षकांनी यास तूफान दाद दिली!
'कासव' (२०१७) चित्रपटात अलोक राजवाडे व इरावती हर्षे!

आता 'कासव' हा नैराश्येच्या गर्तेत असलेल्या मनाचा वेध घेणारा सर्वोच्च पारितोषिक विजेता चित्रपट करणाऱ्या सुमित्रा भावे-सुनिल सुकथनकर यांनी २००४ मध्ये 'देवराई' हा स्किजोफ्रेनिया या मानसिक आजारावरचा चित्रपट दिग्दर्शित केला होता..आणि अतुल कुलकर्णीने ही भूमिका जणू जगली होती! पुढे २०१३ ला आलेला त्यांचा 'अस्तु' सुद्धा असा मनोविकारावरच बेतला होता..ज्यात मोहन आगाशे यांनी अशी व्यक्तिरेखा साकारली होती आणि अमृता सुभाषला यातील सह्रदय भाबड्या भूमिकेसाठी पुरस्कार मिळाला!


याच दरम्यान त्यांनी केलेला चित्रपट 'संहिता' हा एक प्रयोग होता..जो मागे वेगळ्या स्वरुपात युरोपियन चित्रपटांत दिसला होता; पण इथे पटकथा नि व्यक्तिरेखांची गुंफण वेधक साधली गेली नि त्यास संगीताची सुरेल साथ होती..यातील "पलके ना मून्दो.." गाण्यासाठी आरती अंकलीकर यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला! यात देविका दफ्तरदार व मिलिंद सोमण बरोबर राजेश्वरी सचदेवची व्यक्तिरेखा सुंदर होती!
'इफ्फि', गोवा मध्ये मी, दिग्दर्शक गजेंद्र अहिरे व अभिराम भडकमकर!


'चाकोरी' पासून सुमारे ४० लघुपट, टेलीफिल्म्स आणि १४ चित्रपट मराठी व 'बेवक़्त बारिश' सारखे हिंदीही भावे-सुकथनकर यांनी आजवर केलेत. दरम्यान त्यांच्याकडे उमेदवारी केलेली मुलं आता चित्रपट करू लागलेत!

आता 'कासव' ने मिळवलेला 'सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपटा' चा पुरस्कार हे एक रुपकच म्हणावे लागेल त्यांच्या चित्रपट प्रवासाचे!..त्यांचे अभिनंदन!!

तर असे हे आठवणींच्या हिंदोळ्यावर...आम्ही चित्रपट प्रवासी!

- मनोज कुलकर्णी
['चित्रसृष्टी', पुणे]

Saturday 7 April 2018

कास धरा विश्वचित्रभाषेची!

 

ससा-कासवाची 'कथा' सईबाईंनी पूर्वी मांडली..
या क्लिष्ट-बोजड 'कासवा'नेही शर्यत जिंकली!


'श्वास' घेऊन मराठी सिनेमाने घेतली उभारी..
पुन्हा विनोदमामा..'उलाढाली'ची 'दुनियादारी'.!


उपनगरातून (डो.) फास्ट धडकली 'हायवे' वरी..
'बाजी'ने 'वजनदार' झाल्याने गुदमरला कुठेतरी.!


आता कशाला 'मुरंबा' नि घालताय 'ग़ुलाबजाम'
बाहेर या पांढरपेशातून अन बघा उपेक्षित समाज!


नुसती 'धग' दाखवून काय सामाजिकता अंगीकारते..
अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला की मोठे होते?

'नटसम्राट' शिवराळ वठवलेला आव आणतो तसा
"सगळ करून" वर होऊ पाहतो समाजाचा मसीहा.!


सिनेमा म्हणजे 'पॉपकॉर्न' नि 'टाईमपास' नाही..
"झिंगाट" 'शाळा' नको..गरज प्रगल्भ चित्रभाषेची!


- मनोज 'मानस'

(मराठी चित्रपटावरील मागच्या वर्षीचे माझे मार्मिक पुन्हा अद्ययावत रितीने इथे प्रसिद्ध केले!)

Thursday 5 April 2018

विशेष लेख:


'एकटी' ते 'आम्ही दोघी'..मराठी पडद्यावरील बदलती स्त्री!


- मनोज कुलकर्णी

'कुंकू' (१९३७) मधील शांता आपटे यांची कणखर प्रागतिक भूमिका!


'आम्ही दोघी' या नवीन मराठी चित्रपटाची झलक पाहताना वीस वर्षांपूर्वी पाहिलेल्या 'दोघी' चित्रपटाची आठवण होणे स्वाभाविक होते. त्याचबरोबर त्याही सुमारे दोन दशके मागच्या 'एकटी' चित्रपटाचे स्मरण झाले!..आणि मराठी रूपेरी पडद्यावरील बदलत्या स्त्री व्यक्तिरेखांचा पट 'मानिनी' ते अगदी 'उंबरठा' ओलांडून बाहेर स्वतःचे विश्व निर्माण करणाऱ्या कणखर स्त्रीसह डोळ्यांसमोर येऊ लागला!
'ब्रह्मचारी' (१९३८) मधील मिनाक्षी शिरोडकर यांची पेहरावासकट बंडखोर भूमिका!





१९३२ मध्ये 'प्रभात फिल्म कंपनी' च्या 'अयोध्येचा राजा' ने मराठी चित्रपट बोलू लागला; पण त्या पौराणिकपटातील दुर्गाबाई खोटे यांची राणीची भूमिका ही राजा हरिश्चंद्र च्या त्यागाशी समरसलेली होती! मात्र 'प्रभात' च्या पुढच्या चित्रपटांतील नायिका या बंडखोर भूमिका घेणाऱ्या होत्या..यांत 'कुंकू' (१९३७) मधील शांता आपटे आणि 'माणूस' (१९३९) मधील शांता हुबळीकर यांच्या व्यक्तिरेखा प्रागतिक होत्या!..दरम्यान अल्पावधीतच मास्टर विनायकांच्या 'ब्रह्मचारी' (१९३८) मधून मिनाक्षी शिरोडकर यांच्या (पेहरावासकट) बंडखोर स्त्री व्यक्तिरेखेने "यमुनाजळी खेळू खेळ कन्हैय्या.." गात प्रस्थापित भोंगळ नीतिमूल्यांना आव्हान दिले!
'एकटी' (१९६८) मध्ये त्याग व वात्सल्यमूर्ती ..सुलोचनाबाई!



आदरणीय सुलोचनाबाई यांनी तर स्त्रीचे उदात्त चित्र नेहमीच आपल्या भूमिकांद्वारे दर्शवले. यांत १९५३ मध्ये आलेल्या 'वहिनींच्या बांगड्या' या मराठी चित्रपटाच्या इतिहासात एक मानदंड ठरलेल्या चित्रकृतीने तर त्यांची तशी मूर्तिमंत मांगल्य नि वात्सल्य ही प्रतिमा निर्माण केली. तर स्त्रीत्वाचे सोसणेही पडद्यावर येत होते..यांत त्यांनी साने गुरुजींच्या कथेवरील 'मोलकरीण' (१९६३) चित्रपटात खस्ता खाऊन वाढवलेल्या मुलाकडेच घरकाम करण्याची वेळ आलेल्या स्त्रीची वेदना हृदयस्पर्शी व्यक्त केली. पुढे राजा ठाकुर यांच्या 'एकटी' (१९६८) मध्येही त्यांची भूमिका अशीच कष्टाने घर उभे करणाऱ्या समर्पित स्त्रीची होती!
माधव शिंदे यांच्या 'शिकलेली बायको' (१९५९) मध्ये उषा किरण!

मग एकीकडे कौटुंबिक तर दूसरीकडे सामाजिक अशा मराठी चित्रपटांतून स्त्री व्यक्तिरेखा आपले अस्तित्व दाखवू लागल्या. यांत दिग्दर्शकांनी पण तशी प्रागतिक भूमिका घेतली! यांत १९५९ मध्ये माधव शिंदे यांच्या 'शिकलेली बायको' द्वारे उषा किरण यांनी शिकून-सवरून आपल्या दृष्टीकोनातून विश्व पाहणारी स्त्री खऱ्या अर्थाने उभी केली! 

याच सुमारास आलेल्या अनंत माने यांच्या 'सांगत्ये ऐका' (१९५९) या तूफान गाजलेल्या तमाशापटात हंसाबाई वाडकर यांनी फडावरून..मर्दुमकी दाखवणाऱ्या गावपाटलाचे धिंडवडे काढले! नंतर माने यांच्याच 'मानिनी' (१९६१) या प. महादेवशास्त्री जोशी यांच्या कथेवरील चित्रपटात जयश्री गड़कर यांनी "उमा म्हणे यद्नि माझे जळाले माहेर.." गात श्रीमंतीचा त्याग करून प्रेमाखातर गरीब नवऱ्याचा संसार उभी करणारी स्वाभिमानी स्त्री साकारली!
अनंत माने यांच्या 'सांगत्ये ऐका' (१९५९) या गाजलेल्या चित्रपटात 
हंसाबाई वाडकर , सूर्यकांत, जयश्री गड़कर व दादा साळवी!

'जैत रे जैत' (१९७७) या डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपटात स्मिता पाटील!
दरम्यान सोशिक स्त्रीच्या भूमिका आधुनमधून मराठी चित्रपटांतून येतच होत्या. यात 'सतीचं वाण' (१९६९) या सहृदय महिलांना अतिशय भावलेल्या चित्रपटाने त्यातील आशा काळे यांच्या वाटेला पुढे सोसणे म्हणजे ते किती इतक्या तशा भूमिका आल्या..त्यांत 'सासुरवाशीण' ने कहर केला! 

मात्र त्याच काळात आलेल्या सुंदर व काहीशा अल्लड रंजनाने शांतारामबापूंच्या 'चानी' (१९७७) मधून मराठी नायिकेचे रूपच बदलले आणि नंतर तिच्या 'सुशीला' (१९७८) मधील बिनधास्त अदाकारीने तर कमालच केली!
शांतारामबापूंच्या 'चानी' (१९७७) मध्ये विदेशी रूपात रंजना!



याच काळात मराठी चित्रपटात खऱ्या अर्थाने बंडखोर भूमिकेच्या अभिनेत्रीचा उदय झाला आणि ती म्हणजे..स्मिता पाटील! 'जैत रे जैत' (१९७७) या गो. नी. दांडेकर यांच्या कादंबरी वरील डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपटातून "मी रात टाकली, मी कात टाकली.." असं झुगारलेले बेधुंद जीवन जगणारी आदिवासी स्त्री तिने बेमालूम साकारली! पुढे डॉ. पटेल यांच्याच 'उंबरठा' (१९८२) चित्रपटाने तर तिच्या अशा स्त्री मुक्ति आविष्काराने कळस गाठला! पारंपारिक सुखी घराचा उंबरठा ओलांडून स्त्रियांच्या उध्धाराच्या कार्यास वाहून घेतलेली तिची ही श्रेष्ठतम भूमिका समाजातील स्त्री वर्गास दिशादर्शक ठरली!
'दोघी' (१९९६) मध्ये सोनाली कुलकर्णी व रेणुका दफ्तरदार!

यानंतर बेगड़ी विनोदी नि साचेबद्ध कौटुंबिक मराठी चित्रपटांच्या दहाएक वर्षांच्या काळात अशा उल्लेखनीय स्त्री भूमिका अगदी अभावाने दिसल्या..आणि १९९५ मध्ये मुंबई येथे झालेल्या आपल्या 'आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा ' ('इफ्फी') च्या 'इंडियन पॅनोरमा' मध्ये डॉ. पटेल यांच्या 'मुक्ता' चे प्रदर्शन झाले आणि त्यातील सोनाली कुलकर्णी ची जातपात विरोधी प्रागतिक विचारांच्या मुलीची भूमिका पाहून पुनश्च या बंडखोर भूमिकेचा उदय झाल्याचे जाणवले! त्याच्या पुढच्याच वर्षी दिल्लीत झालेल्या 'इफ्फी' मधील 'पॅनोरमा'त पुन्हा तिची त्या सदृश भूमिका असणारा..सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर यांचा 'दोघी' (१९९६) हा चित्रपट पाहताना तर त्यावर शिक्कामोर्तब झाले! तिथे आम्हां चित्रपट समीक्षकांच्या चर्चेत तर तिची तुलना स्मिता पाटीलशी झाली!
'अवंतिका' या दूरचित्रवाणी मालिकेत रूपगुणसंपन्न अभिनेत्री..मृणाल कुलकर्णी!

दरम्यान दूरचित्रवाणीच्या पडद्यावरही अशी प्रागतिक आधुनिक स्त्री भूमिका 'अवंतिका' मधून रंगवली..रूपगुणसंपन्न अभिनेत्री मृणाल कुलकर्णीने!

अलीकडच्या काळात देविका दफ्तरदारने संवेदनशील भूमिका साकारलेला 'नितळ' (२००६), अदिती देशपांडेंचा सामाजिक समस्याप्रधान 'नॉट ओनली मिसेस राऊत' (२००९) व उषा जाधवची वेधक भूमिका असलेला 'धग' (२०१२) सारखे चाकोरीबाह्य, अन्यायाविरुद्ध उभ्या राहणाऱ्या स्त्री व्यक्तिरेखां असलेले चित्रपट येत राहिले!

नवीन 'आम्ही दोघी' या मराठी चित्रपटात प्रिया बापट आणि मुक्ता बर्वे!
मग आधुनिक स्त्रीचे प्रतिबिंबही मराठी चित्रपटांत पडले..आणि आता 'आम्ही दोघी' हा प्रतिमा जोशी दिग्दर्शित नवा चित्रपट आला आहे. दोन काहीशा भिन्न प्रकृतीच्या जिवलग मैत्रिणी आणि त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन असे काहीसे हे चित्र दिसते..यांत मुक्ता बर्वे जबाबदार समंजस स्त्रीच्या व्यक्तिरेखेत आणि प्रिया बापट तिच्या नेहमीच्या अल्लड (काहीशा टॉमबॉईश) भूमिकेत दिसते!


आधुनिक नि प्रागतिक विचारांच्या स्त्री व्यक्तिरेखा मराठी चित्रपटांतून दिसणे ही कायमस्वरूपी काळाची गरज आहे. त्यासाठी शुभेच्छा!


- मनोज कुलकर्णी
['चित्रसृष्टी', पुणे]