Sunday 16 October 2022

राजदत्त..मराठी चित्रपटसृष्टीचे ऋषीतूल्य व्यक्तिमत्व!


आपल्या मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज राजदत्त जी यांनी आता वयाची नव्वदी पूर्ण केली आहे. सुमारे साठ वर्षांच्या कारकिर्दीत विविध शैलीचे मराठी चित्रपट अत्यंत संवेदनशीलतेने हाताळलेले ते आता या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे आहेत!

विदर्भात अमरावती जिल्ह्यात जन्मलेल्या त्यांचे मूळ नाव दत्तात्रय मायाळू! शालेय-महाविद्यालयीन काळांत त्यांनी कुसुमाग्रजांचे 'दूरचे दिवे' आणि आचार्य अत्रे यांचे 'उद्याचा संसार' यांसारख्या नाटकांतून भूमिका केल्या होत्या. ते काम प्रख्यात चित्रपटकर्ते राजा परांजपे यांच्या हस्ते पारितोषिक मिळून वाखाणले गेले. पुढे राजाभाऊंचे सहाय्यक होऊन त्यांनी चित्रपट क्षेत्रांत प्रवेश केला!

राजदत्त दिग्दर्शित पहिल्या 'मधुचंद्र' (१९६७) चित्रपटात डॉ. काशिनाथ घाणेकर व उमा!
समाजसेवा व स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा हिरीरीने सहभाग असे. गोवा मुक्ती संग्रामात ही ते उतरले! लेखक ग.त्र्य. माडखोलकर यांच्या प्रोत्साहनाने त्यांचे वृत्तपत्रीय लेखन सुरु झाले होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर नागपूर व पुणे इथे काही काळ त्यांनी पत्रकारिता केली. नंतर (त्या काळच्या) मद्रास येथे जाऊन 'चांदोबा' या मासिकाच्या संपादकीय विभागात त्यांनी काम केले. तिथल्या वास्तव्यात त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. १९५९ च्या सुमारास तिथे नामांकित 'एव्हीएम' या चित्रपट निर्मिती संस्थेचा 'बाप बेटे' हा चित्रपट राजा परांजपे दिग्दर्शित करीत होते. तेंव्हा त्यांच्याकडे या मायाळूंना उमेदवारी करायला मिळाली!

तर असा राजाभाऊंमुळे चित्रपट क्षेत्रात प्रवेश झाल्याने, त्या नावातील 'राज' ला स्वतःच्या नावातील 'दत्ता' जोडून त्यांनी "राजदत्त" नाव धारण केले! 'जगाच्या पाठीवर', 'आधी कळस मग पाया', 'हा माझा मार्ग एकला', 'पडछाया' अशा जवळपास १३ गाजलेल्या मराठी चित्रपटांसाठी राजाभाऊंचे ते सहाय्यक होते. १९६७ च्या सुमारास 'मधुचंद्र' या चित्रपटाद्वारे राजदत्त यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शन करण्यास सुरुवात केली. प्रा. प्रभाकर ताम्हाणे यांच्या मूळ हलक्याफुलक्या प्रेमकथेवरील हा मधुसूदन कालेलकर यांनी पटकथा लिहिलेला चित्रपट लाईट-रोमँटिक शैलीत त्यांनी हाताळला. साधारण हिंदी शहरी बाजाच्या या चित्रपटासाठी त्यांनी एन. दत्ता यांच्या कडून संगीत करून घेतले आणि आशा भोसलें बरोबर महेंद्र कपूर यांचा आवाज वापरला! शीर्षकगीतासह (जे माझे एक आवडते आहे ते) "सुरावटीवर तुझ्या उमटती.." अशी यातील भावरम्य गाणी गदिमांनी लिहिली होती. सुंदर मोहक उमा व डॉ. काशिनाथ घाणेकर ह्या कलाकारांनी यांतील प्रेमी युगुल पडद्यावर तितक्याच तरलतेने साकारले! हा गाजलेला चित्रपट त्या काळचा रोमँटिक-कॉमेडी अन आजच्या भाषेत "रॉमकॉम"!

'घरची राणी' (१९६८) चित्रपटात सहकलाकारासह अनुपमा व सुलोचना!
यानंतरचा दुसरा चित्रपट करण्यास त्यांना चित्रमहर्षी भालजी पेंढारकर व स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर ह्यांचे सहकार्य लाभले. कोल्हापूरच्या 'जयप्रभा स्टुडिओ'त भालजींच्याच कथेवर 'घरची राणी' (१९६८) हा स्त्रीप्रधान चित्रपट त्यांनी केला, ज्याची नायिका होती..लोभस सौन्दर्यवती अनुपमा! यांतील "संसार हा सुखाचा मी अमृतात न्हाते.." हे दत्ता डावजेकर यांच्या संगीतातील जगदीश खेबुडकर यांचे लताजींनी गायलेले गीत संस्मरणीय ठरले. महाराष्ट्र शासनाचा 'सर्वोत्कृष्ट चित्रपटा'चा पुरस्कार यास मिळाला! त्यानंतर असे वेगवेगळ्या धर्तीचे चित्रपट राजदत्तजी यशस्वीरित्या दिग्दशित करीत गेले, जे वेगवेळ्या गोष्टींनी वैशिष्ठ्य पूर्ण ठरले! ह्यांमध्ये रमेश देव व सीमा ह्यांच्या अनोख्या भूमिका असलेला 'अपराध' (१९६९) होता, लेखक ग. दि. माडगुळकर, शंकर पाटील, व्यंकटेश माडगुळकर, द. मा. मिरासदार व चित्रकर्ते राजा परांजपे ह्यांच्या खुमासदार भूमिका असलेला उपहासात्मक 'वऱ्हाडी आणि वाजंत्री' (१९७३) होता, सचिन व नवोदित वंदना पंडित यांच्यासह शास्त्रीय गायक वसंतराव देशपांडे यांची हृदय भूमिका असलेला श्रद्धेवर आधारित 'अष्टविनायक' (१९७९) होता, तर स्त्री शक्तीचं उदात्तीकरण करणारा (माझी एक आवडती अभिनेत्री) रंजना च्या समर्थ अभिनयाचे दर्शन घडविणारा 'अरे संसार संसार' (१९८१) होता!

 
त्यांतही सामाजिक विषयांवर प्रकाशझोत टाकणारे राजदत्तजींचे चित्रपट हे प्रभावी ठरले. ह्यांत समाजसुधारक संत गाडगेबाबांच्या जीवनावरील गोनीदां लिखित नि डॉ. श्रीराम लागू यांच्या अप्रतिम भूमिकेने नटलेला 'देवकी नंदन गोपाला' (१९७७) होता, वेठबिगाराचं जिणं दर्शवणारा यशवंत दत्त अभिनित वास्तववादी 'शापित' (१९८२) होता, तर जयवंत दळवी यांच्या 'पर्याय' नाटकावर आधारित स्त्रीमुक्ती विषयक 'पुढचं पाऊल' (१९८६) होता आणि पुण्यातील थरारक घटनांवर आधारित बहुचर्चित 'माफीचा साक्षीदार' (१९८६) ही होता! त्यांनी 'दूरी' (१९८९) हा हिंदी चित्रपट ही दिग्दर्शित केला होता आणि त्यांत शर्मिला टागोर व मार्क जुबेर यांच्या बरोबर यशवंत दत्त यांनी भूमिका रंगवली होती!

'शापित' (१९८२) चित्रपटात यशवंत दत्त, मधु कांबीकर, कुलदीप पवार व निळू फुले!
राजदत्तजींनी काही लघुपट व माहितीपट पण केले आणि दूरदर्शन मालिका सुद्धा दिग्दर्शित केल्या. यांत 'गोट्या' मालिका गाजली आणि तिने 'रापा' पुरस्कार मिळवला! त्याचबरोबर 'एक कहानी' ही हिंदी मालिका त्यांनी दिग्दर्शित केली आणि सामाजिक प्रश्नांसंबंधी 'इन सर्च ऑफ सोल्यूशन' ही!

सुमारे २८ चित्रपटांचे दिग्दर्शन राजदत्तजींनी केले आणि त्यांतील १४ चित्रपट राज्य पुरस्कारांनी गौरविले गेले!..असे ते एकमेव दिग्गज मराठी चित्रकर्ते! त्याचबरोबर त्यांचे ३ चित्रपट राष्ट्रीय स्तरावर गौरविले गेले. तसेच ताश्कंद, व्हेनिस यांसारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत त्यांचे चित्रपट समाविष्ट झाले!

महाराष्ट्र राज्याचा 'जीवन गौरव', 'चित्रभूषण', दूरदर्शन सह्यांद्रीचा 'चित्ररत्न' अशा पुरस्कारांनी राजदत्तजी सन्मानित झाले! मोठी चित्रपट कारकीर्द नि उच्च स्थानी पोहोचूनही ते विनम्र असतात. मितभाषी, मृदु बोलणारे ते चित्रपट वर्तुळांत आदराचे स्थान मिळवून आहेत. आडनावाप्रमाणेच 'मायाळू' व्यक्तिमत्व!

अशा आदरणीय दत्ताजींना मानाचा मुजरा!..आणि चांगल्या आरोग्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!

- मनोज कुलकर्णी

No comments:

Post a Comment